R R Patil जयंती विशेष : दहावीच्या परीक्षेत केंद्रात अव्वल, लाठ्या-काठ्याचा धाक दाखवणारं खातं माणसात आणलं, आबांचे 4 धडाकेबाज निर्णय

| Updated on: Aug 16, 2021 | 7:49 AM

लाठी-काठी आणि कायद्याचा धाक दाखवणारं खातं म्हणजे गृहखातं, पण आबांनी या खात्याचा उपयोग माणसाची मनं सांधण्यासाठी केला... सत्ता सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उत्थानासाठी वापरायची असते, हे आबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं.

R R Patil जयंती विशेष : दहावीच्या परीक्षेत केंद्रात अव्वल, लाठ्या-काठ्याचा धाक दाखवणारं खातं माणसात आणलं, आबांचे 4 धडाकेबाज निर्णय
आर आर पाटील...
Follow us on

अक्षय आढाव टीव्ही 9 मराठी, मुंबई : रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील… सर्वसामान्यांचे आबा… आज त्याच आबांची जयंती… 16 ऑगस्ट 1957 ला सांगली जिल्हातील तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावातला त्यांचा जन्म… घरची हालाखीची परिस्थिती… पण शाळेत एकदम हुशार… दहावीच्या परीक्षेत तर आबा केंद्रात पहिले आले… पण परिस्थितीमुळे काम करत करत त्यांना पुढचं शिक्षण घ्यावं लागलं… ‘कमवा आणि शिका योजने’त काम करुन ते पुढचं शिक्षण घेऊ लागले…

पण आबांचा स्वभाव धडपड्या… तिथेही ते शांत बसले नाहीत… तिथे त्यांनी विद्यार्थ्यांचं संघटन केलं… एका आंदोलनात प्राचार्यांसमोर विद्यार्थ्यांची बाजू मांडताना त्यांनी जोरदार भाषण केलं… प्राचार्यांना आबांचं भाषण आवडलं… त्यांनी आबांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला… त्यावर आबा म्हणाले, सर घरची परिस्थिती गरिबीची आहे. स्पर्धेला गेलो तर काम बुडेल, मग खाणार काय?, आबांचं उत्तर ऐकून प्राचार्यांच्या पोटात तुटलं. ते आबांना म्हणाले, काळजी करु नकोस.. तू स्पर्धेला जा… स्पर्धेच्या दिवसांत तुझ्या कामाची हजेरी लावली जाईल… तुला पैसे मिळतील… बस्स… इथूनच आबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली…

आबांनी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली… अनेक स्पर्धा जिंकल्या.. बक्षीसं जिंकली… आबांची भाषणकला दिवेसंदिवस बहरत होती… पुढे आबा राजकारणाकडे वळले… जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा राजकारणातला डोळे दिपवणारा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत सर्वसामान्यांसाठी आबाच राहिले, त्यांनी आबांचा ‘आबासाहेब’ होऊ दिला नाही…!

आर आर आबांचे चार निर्णय ज्यामुळे त्यांनी सामान्यांच्या मनात घर केलं!

आघाडी सरकारमध्ये आर आर आबांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. ग्रामविकास, गृह आणि पुढे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि धोरणी निर्णय घेतले. ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर असताना संपूर्ण राज्यभरात त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवलं. याच कामाने आबांना वेगळी ओळख मिळाली. गावंच्या गावं स्वच्छ झाली, लोकांनी एकत्र येऊन गावं स्वच्छ केलीच पण यानिमित्ताने अनेकांची मनंही स्वच्छ झाली…!

गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं.. गावातल्या लोकांनी भांडणांपासून लांब रहावं आणि जरी भांडण-तंटे झाले तरी कोर्ट कचेरीची पायरी न चढता ते भांडणं गावातच मिटलं जावं, असा त्यापाठीमागचा उद्देश… या अभियानामुळे तुटलेली मनं जवळ आली…. अनेक गावांत कित्येक वर्षांचे भाऊबंदकीतले वाद संपले… दोन-दोन दशकांपांसून असलेले वाद संपुष्टात आले. गावात खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदू लागली… गावांनी विकासाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकलं…

आबांनी गृहमंत्री असताना मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली… त्यामुळे गोर-गरिबांची अनेक पोरं शासकीय सेवेत आली. पर्यायाने अनेक कुटुंबांची गरिबी संपली… पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायला मिळाले… पण शासकीय सेवेत गेलेल्या गरीबांच्या पोरांना आबा सक्त ताकीद देत… की लग्न करताना हुंडा घ्यायचा नाही, आता आपली गरिबी संपली म्हणजे मुलीच्या घरच्यांना कर्जाच्या खाईत लोटाचयं नाही… अशा पद्धतीने पोरी-बाळींच्या बापाचा विचार करणारा राजकारणी विरळाच…

आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबारवरील बंदी…डान्सबारमुळे अनेक तरुण वाममार्गाला लागतात… अनेकांचे संसार उध्वस्त होतात… अनेक तरुण पोरांनी जमिनी विकून त्यातून आलेला पैसा बारमध्ये बारबालांवर उधळला… स्वतःचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतलं… अशा डान्सबारवर बंदी घालणं आवश्यक होतं… डान्सबारवर बंदी घालायचीच, असा पण आबांनी केला आणि त्यांनी तो पूर्णही करुन दाखवला. आबांच्या निर्णयाने अनेक लेकी-बाळींचे संसार वाचले… आजही कित्येक माता माऊल्या आबांना याच कामामुळे आशीर्वाद देतात… आबांबद्दल भरुभरुन बोलत असतात… हीच आबांच्या कामाची पोचपावची….

लाठी काठी आणि कायद्याचा धाक दाखवणारं खातं म्हणजे गृहखातं, पण आबांनी या खात्याचा उपयोग माणसाची मनं सांधण्यासाठी केला… सत्ता सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उत्थानासाठी वापरायची असते, हे आबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं.

(Special report on RR Patil Political Career On His Birth Anniversary)

हे ही वाचा :

RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’, ‘भाऊ-आबांनी’ त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला!