Tulsi Mala and Rudraksha : तुळशी माळ आणि रुद्राक्ष एकत्र वापरू शकतो का ? योग्य नियम काय ?
जर तुम्ही गळ्यात तुळशी माळ आणि हातात रुद्राक्ष घालत असाल तर हे दोन्ही एकत्र वापरता येऊ शकतं की नाही, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. चला जाणून घेऊया सविस्तर..

Can Tulsi and Rudraksha Be Worn Together : सनातन धर्मात तुळशी माळ आणि रुद्राक्षाच्या माळांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. तुळशीची माळ ही भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक मानली जाते, तर रुद्राक्ष भगवान शंकरांशी संबंधित आहे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असते तर रुद्राक्ष हे भगवान शंकरांचं प्रतीक मानलं जातं. अशा परिस्थितीत,दोन्ही माळांचे आपापले वेगळे आध्यात्मिक महत्त्व असतं. तुळशीची माळ आणि रुद्राक्षाची माळ एकाच वेळी घालता येते का, असा प्रश्न लोकांना अनेकदा पडतो. काहींच्या मते, या माळांशी संबंधित ऊर्जा भिन्न असल्याने त्या एकाच वेळी धारण करू नयेत; मात्र, अनेक लोक त्या एकत्रही धारण करतात. तुळस आणि रुद्राक्ष माळा धारण करण्याबाबतच्या धार्मिक समजुती आणि त्यासंबंधीचे योग्य नियम काय आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
तुळशी माळ आणि रुद्राक्ष एकत्र घालता येतं का ?
तुळशी माळ आणि रुद्राक्ष नक्कीच एकत्र धारण करता येऊ शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, ते एकाच वेळी धारण करण्यात काहीही हरकत नाही. रुद्राक्ष भगवान शिवाशी संबंधित आहे, तर तुळस भगवान विष्णूंशी संबंधित आहे. सनातन धर्मात, भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना एकाच परमतत्वाचे रूप मानलं जातं; त्यांचा संयोग ‘हरी’ आणि ‘हर’ यांच्यातील सुसंवादाचे प्रतीक असतं. ‘हरिहर’ हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे संयुक्त रूप आहे; यात एका अर्ध्या भागात ‘हरी’ (भगवान विष्णू) आणि दुसऱ्या अर्ध्या भागात ‘हर’ (भगवान शिव) यांचा समावेश असतो. या श्रद्धेनुसार, तुळस आणि रुद्राक्ष यांपासून बनवलेल्या माळा एकत्र धारण केल्या जाऊ शकतात; त्यांना एकमेकांच्या विरोधातील मानणं योग्य नाही.
शास्त्रांमध्ये दोन्ही माळा एकत्र घालण्यास मनाई आहे का ?
हिंदू धर्मातील उपलब्ध प्रमुख शास्त्रे आणि पुराणं पाहता, तुळशीची माळ आणि रुद्राक्ष एकाच वेळी धारण करू नयेत, असा कोणताही ठोस नियम आढळत नाही. त्यामुळे दोन्ही माळा एकत्र घालणं धार्मिकदृष्ट्या निषिद्ध आहे, असं निश्चितपणे म्हणता येत नाही. मात्र काही ठिकाणी तुळशीची माळ आणि रुद्राक्ष यांची उपासना-पद्धती किंवा आध्यात्मिक महत्त्व वेगवेगळे असल्याचं सांगितलं जातं. तसेच, दोन्हींची ऊर्जा किंवा स्वरूप भिन्न असल्यामुळे त्या एकत्र धारण करू नयेत, अशा काही लोकमान्यताही समाजात प्रचलित आहेत. मात्र, या मतांना सर्व हिंदू शास्त्रांची सार्वत्रिक मान्यता आहे असं म्हणता येत नाही.
तुळशीची माळ आणि रुद्राक्ष धारण करण्याचे नियम
दीक्षेचे नियम – जर तुम्ही एखाद्या गुरु, संप्रदाय किंवा विशिष्ट धार्मिक परंपरेतून दीक्षा घेतली असेल, तर त्या परंपरेने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे योग्य मानलं जातं. तसंच करावं.
जप माळ वेगळ्या ठेवा – गळ्यात धारण करण्यासाठी जी माळ वापरली जाते ती आणि मंत्रजपासाठी वापरली जाणारी माळ, या दोन्ही शक्यतो स्वतंत्र, वेगळ्या ठेवाव्यात. ज्या माळेने नियमित मंत्रजप केला जातो, ती माळ गळ्यात धारण न करता जपासाठीच वापरण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते.
सात्विक जीवनचर्या – तुळशीची माळ धारण करणे हे भक्ती आणि धार्मिक आचरणाशी जोडलेलं मानलं जातं. त्यामुळे तुळशीची माळ धारण करणाऱ्या व्यक्तीने शक्य तितके सात्त्विक जीवन जगावे, असं मानलं जातं. यामध्ये शाकाहारी आहार घेणे तसेच मांस, मद्य, लसूण आणि कांदा यांचा त्याग करणे यांचा समावेश असतो.
(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. टीव्ही9 मराठी या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)