Eknath Shinde : ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, पोलिस यंत्रणा कामाला लागली? DCM एकनाथ शिंदे यांनी खरं काय ते सांगून टाकलं!
एकनाथ शिंदे यांचा मोबाईल हरवल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः यासगळ्यावर त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. ते दरेगावात आज बोलत होते. नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच लंडन दौऱ्याहून परतले आहेत. 12 सप्टेंबर रोजी त्यांचा मध्यरात्री मुंबई विमानतळावर उतरले असताना एकनाथ शिंदे हे त्यांचा मोबाईल फोन विमानात विसरले असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे बऱ्याच वेळानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर जवळपास दोन तासांनंतर शिंदेंना त्यांचा मोबाईल मिळाला अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता हे सगळं प्रकरण शिंदे यांच्या कार्यालयानं फेटाळून लावलं आहे.
शिंदे यांचा मोबाईल विसरल्यानंतर ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एकनाथ शिंदे यांचा मोबाईल शोधून काढला, अशी माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं शिंदे यांच्या कार्यलयाकडून सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर खुद्द एकनाथ शिंदे यांनीही एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं की, “काही मोबाईल वगैरे काही राहिला नव्हता.’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ दरे गावी भेट दिली. यावेळी एकनाथ शिंदेंनी परिसरातील बांबू उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात भेट दिली. या वेळी बोलतांनी एकनाथ शिंदेंनी विरोधकावंरही टीका केली की, विरोधकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय राहवत नाही.
विरोधकांचे काम केवळ टीका करणे आणि आरोप करणे हेच आहे, आपण आपल्या कामाने या टीकेला उत्तर देतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस मुक्कामी आले आहेत. दरेगावात त्यांनी आज जागतिक बांबू दिवस साजरा करत बांबू झाडांची लागवड केली आहे. आपल्या शेतात सफरचंद, एवोकॅडो, अगरवूड, चंदन, रक्तचंदन, प्लम, ॲप्रिकॉट, कापूर तसेच हिंग अशा विविध वृक्षांची व पिकांची यशस्वी लागवड केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या भागात सफरचंद पिकेल यावर कोणाचा विश्वास नव्हता, मात्र दोन वर्षांत झाडांना बहर येऊन हा प्रयोग यशस्वी झाला आहे. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून, बांबूपासून इथेनॉल व अनेक उत्पादने तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी याकडे वळावे. नगदी पिके आणि पर्यटन विकासाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे नोकरीसाठी मुंबईकडे गेलेला तरुण वर्ग पुन्हा आपल्या गावाकडे परतायला मदत होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
दुष्काळासंबंधी पाच तारखेपासून आम्ही पंचनामे करु
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलांसह मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, अतिवृष्टी किंवा गारपीट याबाबत शासन संवेदनशील आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल. ग्रामीण भागातील विजेच्या लपंडावावर व लोडशेडिंगवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून महावितरणला ही समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधकांचे काम केवळ टीका करणे आणि आरोप करणे हेच आहे, आपण आपल्या कामाने या टीकेला उत्तर देतो, जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा सरकारवर व शिवसेनेवर विश्वास असल्याने अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षात सहभागी होतात, असं शिंदे म्हणाले आहेत.
