
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात, ते तुमच्या तोंडावर गोड बोलतात. मात्र त्यांच्या मनामध्ये तुमचं चांगलं व्हावं अशी भावना कधीच नसते, त्यामुळे ते तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत गद्दारी करतात. तुम्हाला धोका देतात. अशा लोकांपासून आपण नेमही सावध राहिलं पाहिजे. जर आपण बेसावध राहिलो तर असे लोक कधीही आपला घात करू शकतात. चाणक्य म्हणतात जे आपल्या जवळचे असतात तेच आपल्याला अनेकदा धोका देतात, त्यामुळे असे लोकं ओळखणं हे खूप कठीण काम असतं. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी दिसल्या तर तुम्ही सावध होणं गरजेचं असतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
बदललेली वृत्ती – चाणक्य म्हणतात अनेकदा असं होतं की काही जण हे आपले चांगले मित्र असतात, हितचिंतक असतात. मात्र जेव्हा आपल्या प्रगतीला सुरुवात होते, तेव्हा ती प्रगती त्यांना बघवत नाही. अशा वेळी अचानक अशा व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामध्ये फरक जाणवू लागतो, जेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्या -बोलण्यामध्ये फरक दिसतो, तेव्हा वेळीच सावध व्हा. कारण असे व्यक्ती हे तुमच्याविरोधात कट कारस्थान रचण्याची शक्यता असते.
अतिगोड बोलणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक अतिगोड बोलतात त्यांच्यापासून तर कायम सावध राहण्याची गरज असते. जे लोक तुमच्या तोंडावर स्पष्ट बोलतात, अशा लोकांच्या गोष्टी तुम्हाला भलेही कटू वाटतील, मात्र त्यांच्या मनात जे असतं, तेच त्यांच्या तोंडात देखील असतं. मात्र जे लोक अतिगोड बोलतात, हे लोक कधीच तुम्हाला तुमचे दोष सांगत नाहीत. उलट ते तुमच्या चुकांवर टपलेले असतात. त्यामुळे जर तुमच्याशी एखादा व्यक्ती अतिगोड बोलत असेल तर त्याच्यापासून वेळीच सावध व्हा, त्याचं कारण शोधून काढा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
समोर कौतुक, मागे निंदा – चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, जे समोर आपलं कौतुक करतात. मात्र पाठीमागे आपली निंदा करतात, अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, असे लोक तुम्हाला धोका देत असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)