देशातलं अजब मंदिर, लोकांना बांधून… भुतांनाच दिली जाते शिक्षा; नाव वाचून बसेल मोठा धक्का!
Mehandipur Balaji Temple : दौसा जिल्ह्यात एक असे पवित्र स्थान आहे, ज्याच्याशी संबंधित कथा ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येतो. या मंदिराचे नाव मेहंदीपूर बालाजी मंदिर आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

भारतात हजारो प्राचीन मंदिरे आहेत, यातील काही मंदिरे ही श्रद्धा, विश्वास आणि चमत्कारासाठी ओळखली जातात. राजस्थानातील दौसा जिल्ह्यात एक असे पवित्र स्थान आहे, ज्याच्याशी संबंधित कथा ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येतो. या मंदिराचे नाव मेहंदीपूर बालाजी मंदिर आहे. येथे प्रभू श्रीरामांचे परमभक्त भगवान हनुमान बालरूपात विराजमान आहेत. हे मंदिर सामान्य मंदिरांप्रमाणे नसून भूत-प्रेत आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळवून देणारे प्रमुख स्थान मानले जाते. या मंदिराबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मेहंदीपूर बालाजी मंदिराचे वातावरण इतर मंदिरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि भयावह आहे. येथे येणाऱ्या धाडसी व्यक्तींच्याही मनात भीती निर्माण होते. मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उघडपणे भूत-प्रेतांवर न्यायनिवाडा होत असल्याची श्रद्धा आहे. येथे बालाजी महाराजांसोबत भैरव बाबा आणि प्रेतराज सरकार यांचाही वास आहे. प्रेतराज सरकार यांना या दरबारातील न्यायाधीश मानले जाते.
प्रेतराज सरकार देतात शिक्षा
पौराणिक श्रद्धेनुसार प्रेतराज सरकार नकारात्मक शक्तींना शिक्षा देतात. मंदिरात आलेल्या बाधित व्यक्तीच्या शरीरात वास करणारी वाईट शक्ती त्यांच्या भीतीने थरथर कापू लागते आणि अस्वस्थ होते. येथे अनेकजण मोठ्याने ओरडताना, भिंतीवर डोके आपटताना किंवा विचित्र हालचाली करताना दिसतात. अशी मान्यता आहे की, बालाजी महाराजांच्या प्रभावामुळे वाईट शक्ती आपला अपराध मान्य करून बाधित व्यक्तीचा कायमचा त्याग करतात.
अनेकांना साखळीने बांधले जाते
या खास मंदिरात प्रवेश करताच एक वेगळेच वातावरण अनुभवायला मिळते. चारही बाजूंनी रडण्याचे, ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येतात. काही व्यक्ती आक्रमक झाल्यास त्यांना जड लोखंडी साखळ्यांनी बांधले जाते. येथे कोणत्याही तांत्रिक पद्धतीने झाडफुंक केली जात नाही. बालाजींचे नामस्मरण आणि पवित्र भस्म लावल्याने मोठ्यात मोठी बाधा दूर होते, अशी श्रद्धा आहे.
प्रसाद घरी नेण्यास मनाई
मेहंदीपूर बालाजी मंदिरातून प्रसाद किंवा कोणतीही खाद्यवस्तू घरी नेण्यास मनाई आहे. असे मानले जाते की, मंदिरातील कोणतीही वस्तू घरी नेल्यास नकारात्मक शक्ती किंवा भूत-प्रेतही पाठोपाठ घरी येऊ शकतात. तसेच मंदिरातून बाहेर पडताना मागे वळून पाहण्यासही मनाई आहे. असे केल्यास मुक्त झालेल्या वाईट शक्ती पुन्हा व्यक्तीवर प्रभाव टाकू शकतात.
Disclaimer – या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे. टाव्ही 9 मराठी यातील दाव्यांची पुष्टी करत नाही.