शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणार होते का? खासदार संजय जाधवांचा मोठा खुलासा, सगळं सांगितलं
भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी संजय जाधव यांच्याबद्दल मोठा दावा केला होता, ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान या दाव्यावर आता जाधव यांनी मोठा खुलासा केला आहे.

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वीच मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे, कारण पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे 3 खासदारच राहिले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढून ती 13 वर पोहोचली आहे. शिवसेना शिंदे गट हा राज्यात महायुतीमध्ये सर्वात जास्त खासदारांची संख्या असलेला पक्ष ठरला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटात झालेल्या बंडखोरीनंतर खासदार संजय जाधव यांच्याबद्दल भाजपच्या नेत्या आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मोठा दावा केला होता, संजय जाधव हे भाजपात प्रवेश करणार होते, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता मेघना बोर्डीकर यांच्या या दाव्यावर संजय जाधव यांनी प्रत्युत्त दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय जाधव?
मी भाजपाच्या कुठल्याच नेत्याला कधीही भेटलो नाही, किंवा त्यांना यावर बोललो सुद्धा नाही. त्यांच्याकडे काही इनपुट असेल तर त्यांनी द्यावं. मंत्री मेघना बोर्डीकर आणि आ.रत्नाकर गुटे माझ्या बद्दल ठरवून स्क्रिप्टेड बोलतात. मी मूळ शिवसौनिक आहे, आणि मी मूळ शिवसेनेमध्येच आलो आहे. आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत. त्यांच्या विचारावर आणि आदर्शावर चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझा जन्म भगव्यात झाला शेवट सुद्धा भगव्यात होईल, यात फेरबदल होणार नाही, असं प्रत्युत्तर यावर जाधव यांनी बोर्डीकर यांना दिलं आहे.
मंत्रिपदासाठी चर्चा
दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून ज्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यातील दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांचं नाव आघाडीवर आहे. परंतु आता खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाल्याने मंत्रिपद नक्की कोणाला मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
