
मुंबई, वास्तूशास्त्र (Vastushastra) हे ऊर्जेशी संबंधित शास्त्र आहे. घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे स्वयंपाकघर (Kitchen) मानले जाते. आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. तीच्या कृपेनेच घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. स्वयंपाकघरात कुटुंबासाठी अन्न तयार केले जाते. म्हणूनच असे म्हटले जाते की, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघर बरोबर असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, बऱ्याचदा नकळत आपण अनेक वेळा वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर दिसून येतो. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. चला तर मग जाणून घेऊया किचनमध्ये कोणत्या वस्तू ठेवण्यास मनाई आहे.
वास्तूशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही. म्हणूनच झाडूसह स्वच्छतेच्या गोष्टी दूर ठेवाव्यात. मात्र, स्वयंपाकघरातील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. अशावेळी साफसफाई केल्यानंतर या वस्तू दुसऱ्या ठिकाणी ठेवाव्यात. असं म्हणतात की स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरात धनधान्याची कमतरता भासते. याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. अशा परिस्थितीत अन्न-धान्याची कमतरता भासू नये, यासाठी या सर्व गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात.
वास्तू नियमानुसार स्वयंपाकघरात औषधे ठेवू नयेत. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. असे मानले जाते की किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरामधील सदस्य सतत आजारी पडू शकतात. यामुळे घरात अचानक नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे स्वयंपाकघरात कोणतेही औषध ठेवू नये.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्वयंपाकघरात कधीही आरसा नसावा. त्यामुळे जीवनातील अडचणी वाढतात. असे म्हणतात की स्वयंपाकघरातील आरशामुळे अग्नीचे प्रतिबिंब तयार होते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा प्रसारित होते, जी अत्यंत हानिकारक आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)