मृत्यूनंतर व्यक्तीच्या तोंडात सोनं का ठेवलं जातं?त्याशिवाय अंत्यसंस्कारही केले जात नाहीत; काय सांगतं शास्त्र?
हिंदू धर्मात अनेक ठिकाणी, मृत व्यक्तीच्या तोंडात सोन्याचा तुकडा ठेवला जातो. त्याशिवाय अंत्यसंस्कार केले जात नाहीत. पण नक्की याचं काय कारण आहे?

हिंदू धर्मग्रंथांमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक नियम आणि विधी सांगितले आहेत. ज्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यूही निश्चित असतो. मृत्यू हे एक सत्य आहे जे कोणीही टाळू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या परंपरा आणि प्रथा सांगितल्या गेल्या आहेत ज्या पाळल्या जाणे महत्त्वाचे समजले जाते. या सर्व प्रथा मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी असतात असंही म्हटलं जातं.
अंत्यसंस्काराच्या वेळी मृताच्या तोंडात गंगाजल, तुळशीचे पान आणि सोन्याचा तुकडा ठेवला जातो
तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराची पद्धत वेगळी असते. परंतु हिंदू धर्मात, अंत्यसंस्काराच्या वेळी, मृताच्या तोंडात गंगाजल, तुळशीचे पान आणि सोन्याचा तुकडा ठेवला जातो. जरी, हे अनेक ठिकाणी केले जात नसले तरी तो अंत्यसंस्काराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. हे करण्यामागे एक खास कारण शास्त्रात सांगण्यात आले आहे.
मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल का सोडले जाते?
हिंदू धर्मात गंगा ही देवीचे स्वरुप मानले जाते आणि म्हणूनच तिचे पाणी अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते. असे म्हटले जाते की ते पाणी सर्व पापे धुवून टाकते. पुराण आणि शास्त्रानुसार, जर मृत्यूच्या वेळी त्या व्यक्तीच्या तोंडात गंगाजल सोडले तर यमदूत शरीर सोडताना आत्म्याला त्रास देत नाहीत आणि आत्मा कोणत्याही त्रासाशिवाय शरीर सोडतो. म्हणूनच मृत्यूच्या काही क्षण आधी व्यक्तीला गंगाजल दिले जाते.
मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीचे पान का ठेवले जाते
तुळशीचे पाने हे मृत व्यक्तीच्या तोंडात ठेवले जाते. कारण असे मानले जाते की तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. मृत्यूच्या वेळी तुळशीचे पान तोंडात ठेवल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला यमराजाची शिक्षा भोगावी लागत नाही.
मृत व्यक्तीच्या तोंडात सोने किंवा सोन्याचा तुकडा का ठेवला जातो?
अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीच्या तोंडात सोन्याचा तुकडाही ठेवला जातो. कारण असं केल्याने त्या व्यक्तीचा आत्मा पृथ्वी आणि मृत्युनंतरच्या जीवनात अडकत नाही याची खात्री होते. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की अंत्यसंस्काराच्या वेळी मृताच्या तोंडात, नाकात किंवा कानात सोन्याचा तुकडा ठेवल्याने आत्म्याचे रक्षण होते, कोणत्याही नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडत नाही. आणि आत्मा कोणत्याही अडथळ्याशिवाय मोक्षाच्या मार्गाने जातो. मृत व्यक्तीच्या तोंडात सोने ठेवण्याची परंपरेला पितृ दानही म्हटलं जातं. त्याचा मुख्य उद्देश आत्म्याचा पुढचा प्रवास सुरळीतपणे व्हावा हाच असतो.
मोक्षाची प्राप्ती
मृत्यूनंतर मृत शरीराच्या तोंडात सोन्याचा तुकडा, मोती किंवा नाणे ठेवले तर ते आत्म्यावर सकारात्मक परिस्थिती निर्माण करण्यास मदत करतात. सोने हा एक पवित्र धातू मानला जातो आणि तो आत्म्याच्या शुद्धीकरणाचे आणि पवित्रतेचा प्रतीक मानला जातो. असेही मानले जाते की यामुळे मरणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)