‘आफ्रिदीने कानशिलात लगावल्यावर आमिरकडून स्पॉट फिक्सिंगची कबुली’

| Updated on: Jun 12, 2019 | 9:30 PM

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने 2010 मधील पाकिस्तानी खेळाडूंच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्याने मोहम्मद आमिर आणि सलमान बटच्या फिक्सिंगची अगदी पोलखोल केली आहे.

आफ्रिदीने कानशिलात लगावल्यावर आमिरकडून स्पॉट फिक्सिंगची कबुली
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने पाकिस्तानी खेळाडूंच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार शाहिद आफ्रिदीने वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या कानशिलात लगावल्यानंतर त्याने स्पॉट फिक्सिंगची कबूली दिल्याची धक्कादायक माहिती रज्जाकने सांगितली.

(पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक)

रज्जाकने मुलाखतीत बोलताना हे खुलासे केले. तो म्हणाला, “मी, आफ्रिदी आणि मोहम्मद आमिर एका रुममध्ये सामन्यातील कामगिरीवर बोलत होतो. त्यावेळी आफ्रिदीने मला रुमच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच कानशिलात लगावल्याचा आवाज झाला. त्यानंतर आमिरने तो स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची कबूली दिली.”

(पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर)

या प्रकरणाने पाकिस्तान क्रिकेट संघाची जगभरात बदनामी

या प्रकरणाने पाकिस्तान क्रिकेट संघाची जगभरात बदनामी झाली होती. याला रज्जाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) प्रकरण हाताळणीतील बेजबाबदारपणाला कारणीभूत ठरवले. तो म्हणाला, “पीसीबी आपली कृतीशिलता दाखवण्यासाठी आयसीसीकडे गेले. मात्र, त्यांनी असे करण्याऐवजी यात दोषी 3 खेळाडूंशी चर्चा करुन त्यांना तात्काळ मालिकेतून माघारी पाठवायला हवे होते. तसेच त्यांच्यावर एक वर्ष किंवा काही वर्षांची बंदी घालायला हवी होती. मात्र, पीसीबीने असे न केल्याने जगभरात पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा खराब झाली.”

‘सलमान बट ठरवून खराब खेळत होता’

(सलमान बट)

अब्दुल रज्जाकने सलमान बटविषयी देखील धक्कादायक खुलासा केला आहे. रज्जाक म्हणाला, “सलमान बट 2011 मध्ये इंग्लंडमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या आधीपासून मुद्दाम आऊट होत होता. मी याबाबत आफ्रिदीलाही सांगितले होते, मात्र त्यावेळी आफ्रिदीने तो माझा गैरसमज असल्याचे म्हटले. अखेर वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी बटसोबत फलंदाजी करताना मला धक्कादायक अनुभव आला. मी बटला एक धाव घेऊन मला स्ट्राईक द्यायला सांगितले, मात्र त्याने याकडे साफ दुर्लक्ष केले. मी त्याला कठोरपणे स्ट्राईक द्यायला सांगितली. तरीही त्याने 2-3 चेंडू खेळून मग स्ट्राईक दिली. यामुळे दबावात येऊन मी आऊट झालो. यानंतर माझी खात्री झाली की बट ठरवून खराब खेळत आहे.”

पाकिस्तानच्या खेळाडूंचे स्पॉट फिक्सिंग प्रकरण काय आहे?

सलमान बट्ट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफला 2010 मध्ये लंडनच्या लॉर्ड मैदानावर कसोटी सामना खेळताना स्पॉट फिक्सिंगमध्ये पकडले होते. यावेळी या तिघांनीही एका बुकरकडून पैसे घेऊन सामन्यादरम्यान विशिष्ट वेळी खराब खेळ करण्यास मान्यता दिली होती. या प्रकरणी 2011 मध्ये तिघांवरीलही आरोप सिद्ध झाल्यानंतर आयसीसीने त्यांच्यावर 5 वर्षांसाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. दरम्यान, या प्रकरणाने पाकिस्तान क्रिकेटवर जगभरातून टीका करण्यात आली. सध्या तिन्ही खेळाडूंनी बंदीचा काळ पूर्ण केला आहे. मात्र, सध्या केवळ आमिरलाच पाकिस्तान क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. आमिर वर्ल्ड कप संघाचा भागही आहे.