IndvsAus : ऑस्ट्रेलियाने झुंजवलं, पहिला डाव 235 धावांत आटोपला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अॅडलेड:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावात आटोपला. त्यामुळे भारताकडे केवळ 15 धावांची आघाडी राहिली. डोकेदुखी ठरलेल्या ट्रेविस हेडला बाद केल्यानंतर, भारतीय गोलंदाजींनी कांगारुंचं शेपूट झटपट गुंडाळलं. ट्रेविस हेडने एकाकी झुंज देत 72 धावा केल्या. त्याला तळाचे फलंदाज मिचेल स्टार्क (15) आणि नॅथन लायनने (नाबाद 24) चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला […]

IndvsAus : ऑस्ट्रेलियाने झुंजवलं, पहिला डाव 235 धावांत आटोपला
Follow us on

अॅडलेड:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावात आटोपला. त्यामुळे भारताकडे केवळ 15 धावांची आघाडी राहिली. डोकेदुखी ठरलेल्या ट्रेविस हेडला बाद केल्यानंतर, भारतीय गोलंदाजींनी कांगारुंचं शेपूट झटपट गुंडाळलं. ट्रेविस हेडने एकाकी झुंज देत 72 धावा केल्या. त्याला तळाचे फलंदाज मिचेल स्टार्क (15) आणि नॅथन लायनने (नाबाद 24) चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 235 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. अॅडलेड कसोटीचा आज तिसरा दिवस आहे.

दरम्यान, या कसोटीच्या पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद 250 धावा केल्या होत्या. यामध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराच्या एकट्याच्या 123 धावांचा समावेश होता. भारताच्या अन्य खेळाडूंना मोठी धावसंख्या करता आली नव्हती.

भारताला 250 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज मैदानात उतरले. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अरॉन फिंच आणि मर्कस हॅरिस फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र त्यांना मोठी सलामी देता आली नाही. ईशांत शर्माने अवघ्या तिसऱ्याच चेंडूवर फिंचच्या त्रिफळा उडवून कांगारुंना धक्का दिला. फिंच भोपळाही फोडू शकला नाही.

यानंतर ठराविक वेळाने भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. एकवेळ ऑस्ट्रेलियाची टीम 200 धावाही करु शकणार नाही असं वाटत होतं. मात्र हेडने एक बाजू लावून धरत टिच्चून फलंदाजी केली. हेडने आधी अर्धशतक पूर्ण केलं, त्यानंतर तळाच्या फलंदांच्या साथीने एकेरी-दुहेरी धाव घेत, संघाची धावसंख्या वाढवली.

आता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला मोठी धावसंख्या करुन कांगारुंसमोर मोठं आव्हान उभं करावं लागेल. मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला भारतीय टीम कशी सामोरी जाते ते पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

IndvsAus: ऑस्ट्रेलियाच्या ‘हेड’मुळे भारताला डोकेदुखी! 

ख्वाजाने हवेत उडी मारुन झेल घेतला, विराटही पाहत राहिला!  

फक्त 37 धावा केल्या, पण रोहितने आफ्रिदीचा सर्वात मोठा विक्रम मोडला  

अॅडलेड कसोटी : पुजाराच्या शतकाने भारताची लाज राखली!  

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार