मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मिळाली. रहाणेने ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. शतकी खेळीसह त्याने भारताला दुसऱ्या कसोटीत विजयही मिळवून दिला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. (ajinkya rahane super performence against australia in 2nd test at mcg)
विराट मायदेशी परतला. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. ऑस्ट्रेलियाॉकडून पहिल्या सामन्यात अपमानजनक पराभव स्वीकारावा लागला. सलामी जोडी अयशस्वी ठरत होती. यामुळे कर्णधार म्हणून अजिंक्यसमोर दुसऱ्या कसोटीसाठी अनेक आव्हानं होती. मात्र अजिंक्यने या आव्हानांच्या छाताडवर पाय देऊन उभा राहिला.
दुसऱ्या सामन्यात काही अपेक्षित बदल केले गेले. फ्लॉप पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला. त्या जागी शुभमग गिलला संधी देण्यात आली. तर दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली. या दोन्ही खेळाडूंचं हे कसोटी पदार्पण ठरलं. रहाणेने या दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांचा अचूक आणि योग्य वापर केला. भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना पहिल्या डावात 195 धावांवर रोखलं. गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. यानंतर फलंदाजांची वेळ होती.
टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिली विकेट स्वस्तात गमावली. मयांक अग्रवालला भोपळाही फोडता आला नाही. मयांकचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पदार्पणातील शुभमन गिलने 45 धावा केल्या. टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने 17 धावांची झुंजार खेळी केली. भारताने पहिल्या विकेटनंतर पुढील 2 विकेट झटपट गमावले. यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. यानंतर कर्णधार अजिंक्यने हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांच्यासह अर्धशतकी भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाचा डावाला स्थिरता मिळाली.
पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जाडेजा मैदानात आला. जाडेजा-अजिंक्यने जोडीने सहाव्या विकेटसाठी 121 धावांची शतकी भागीदारी केली. ही भागीदारी निर्णायक ठरली. या भागीदारीदरम्यान अजिंक्यने शानदार शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 12 वं शतक ठरलं. अजिंक्यने एकूण 112 तर जाडेजाने 57 धावा केल्या. या दोघांच्या झुंजार खेळीमुळे भारताला 131 धावांची आघाडी मिळाली. भारताचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला.
बीसीसीआयने केलेलं ट्विट
Special words of appreciation for @ajinkyarahane88 from the Head Coach.
Do you agree?#AUSvIND pic.twitter.com/SHyRr2sOji
— BCCI (@BCCI) December 29, 2020
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही अफलातून गोलंदाजी केली. फिरकीपटूंसह वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुंना पाचारण केलं. या दरम्यान गोलंदाजी करताना उमेश यादव दुखापतग्रस्त झाला. त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना दुसऱ्या डावात 200 धावावंर गुंडाळले.
भारताला विजयासाठी 70 धावांचे माफक आव्हान मिळाले. हे आव्हान भारताने 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताने ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात केली. यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
रहाणेने या दुसऱ्या सामन्यात कर्णधारासह एका जबाबदार फलंदाजाचीही भूमिका पार पाडली. अजिंक्यने गोलंदाजांचा अचूक वापर केला. गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. गोलंदाजांनी निर्णायक वेळी विकेट्स मिळवून दिले. पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजने एकूण 5 विकेट्स घेतल्या. अनुभवी जसप्रीत बुमराह आणि आर अश्विननेही धमाकेदार कामगिरी केली.
अजिंक्यने पहिल्या डावात 112 तर दुसऱ्या डावात नाबाद 27 धावांची खेळी केली. अजिंक्यचं कसोटी कारकिर्दीतील हे 12 वं तर ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरं शतक ठरलं. विशेष म्हणजे अजिंक्यने हे दोन्ही शतक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीमध्ये लगावले.
या सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी अजिंक्यला जॉन मुलघ पदकाने सन्मानित करण्यात आलं. अजिंक्य हे पदक पटकवणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
अंजिक्य रहाणे जॉन मुलघ पदकाने सन्मानित
The proud recipient and the inaugural winner of the Mullagh Medal – #TeamIndia Captain @ajinkyarahane88 #AUSvIND pic.twitter.com/0cBe2icMzz
— BCCI (@BCCI) December 29, 2020
अजिंक्यने त्याच्यात असलेली चुणूक दाखवून दिली. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या क्रिकेटपटूंना सोबत घेऊन किल्ला लढवला आणि जिंकला. रहाणेच्या शांत आणि संयमी स्वभावाचा फायदा नवख्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला झाला. या दोघांनी पदार्पणात अपेक्षित कामगिरी केली.
खेळाडूंकडून चूक झाल्यास कर्णधार त्यांचे कान उपटतो. मात्र अजिंक्य कर्णधार म्हणून याबाबतीत अपवाद ठरला. अजिंक्य पहिल्या डावात रवींद्र जाडेच्या चुकीमुळे रन आऊट झाला. मात्र अजिंक्य जाडेजावर संतापला नाही. अजिंक्यने जाडेजाला मोठ्या खेळीसाठी प्रोत्साहित केलं. मी बाद झालो. पण तु खेळ, असे संकेत अजिंक्यच्या हावभावातून मिळाले. अजिंक्यच्या या कृतीमुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक केलं गेलं.
रोहित शर्माने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलं. यानंतर त्याने 30 डिसेंबरला भारतीय संघात प्रवेश केला. इतर सहकाऱ्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. रोहितच्या पुनरागमनामुळे भारताला बळकटी मिळाली आहे. तसेच दुखापतीमुळे उमेश यादवला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं. यामुळे उमेश यादवच्या जागी यॉर्कर किंग थंगारासून नटराजनला संधी देण्यात आली आहे. तसेच शार्दूल ठाकूरचाही समावेश केला आहे.
आगामी तिसऱ्या सामन्यात कर्णधार आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी मुंबईकर अजिंक्य आणि रोहितकडे असणार आहे. तिसरी कसोटी 7 जानेवारीला सिडनीत खेळण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. यामुळे या तिसऱ्या सामन्यात कोण वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
AUS vs IND Test Series | हिटमॅन रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य 4 खेळाडू आयसोलेट
Sourav Ganguly | अँजियोप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह
(ajinkya rahane super performence against australia in 2nd test at mcg)