Chennai Test Report : इंग्लंडविरोधात ‘मिशन 420’, टीम इंडियासाठी पाचवा दिवस ‘मंगल’ ठरणार?

| Updated on: Feb 08, 2021 | 7:14 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.

Chennai Test Report : इंग्लंडविरोधात ‘मिशन 420’, टीम इंडियासाठी पाचवा दिवस मंगल ठरणार?
Follow us on

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा (8 फेब्रुवारी) चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. यामुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 90 षटकांमध्ये 381 धावांचे आव्हान असणार आहे. तर इंग्लंडला जिंकण्यासाठी 9 विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पाचव्या दिवशी नक्की काय निकाल लागणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Chennai Test Report : England Set record 420 runs Target for India)

कालच्या (तिसऱ्या दिवस अखेर) 6 बाद 257 धावांवरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज सकाळी 80 धावा अधिक जोडल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 85 तर रवीचंद्रन अश्विनने 31 धावा केल्या. उर्वरित कोणत्याही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. ऋषभ पंतच्या 91, सुंदरच्या 84 आणि चेतेश्वर पुजाराच्या 73 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 337 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यासाठी किमान 379 धावा करणे बंधनकारक होते. मात्र त्यानंतरही इंग्लंडच्या कर्णधाराने भारताला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास पसंती केली. परंतु इंग्लिश कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना 178 धावांमध्ये गुंडाळले. कर्णधार जो रुटने दुसऱ्या डावात सर्वाधिक 40 धावांची खेळी केली.

रोहितकडून अपेक्षा भंग

पहिल्या डावातील 241 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 178 धावा मिळून इंग्लंडच्या संघाने भारताला दुसऱ्या डावात 420 धावांचे आव्हान दिले आहे. आज इंग्लंडचा संघ ऑल आऊट झाल्यानंतर 420 धावांचं लक्ष्य घेऊन भारतीय संघ मैदानात आला. आज दिवसअखेर टीम इंडियाने 1 बाद 39 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा सामन्याच्या दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची मदार प्रामुख्याने सलामीवीर रोहित शर्मावर होती. परंतु रोहित 12 धावांवर असताना फिरकीपटू जॅक लीचने त्याला त्रिफळाचित (बोल्ड) केलं. त्यानंतर सलामीवीर शुबमन गिल (15) आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने (12) सावध खेळ करत टीम इंडियाच्या धावफलकावर 39 धावा लावल्या आहेत.

पुजारा-गिलमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास

हा सामना भारत जिंकू शकतो, पराभूत होवू शकतो अथवा हा सामना अनिर्णित राहू शकतो. भारतीय संघासमोरचं आव्हान मोठं असल्यामुळे आणि त्यातच रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कदाचित भारतीय खेळाडू बचावात्मक खेळ करुन सामना ड्रॉ करतील, असं वाटत होतं. परंतु रोहित बाद झाल्यानंतरही शुबमन गिल आणि पुजारा चांगल्या धावगतीने धावा जमवत होते. गिलने तीन आक्रमक फटक्यांवर तीन चौकारही वसूल केले. त्यांचा खेळ पाहून ही जोडी जिंकण्याच्या आत्मविश्वासाने खेळत आहे, असं दिसतं.

विराट-अजिंक्य आणि पंतवर भिस्त

चेपॉकचं मैदान फिरकीसाठी अनुकूल आहे. तसेच सामन्याच्या चौथ्या पाचव्या दिवशी है मैदान फिरकीला खूप मदत करणारं आहे. त्यामुळे उद्या सामन्याच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू जॅक लीच आणि डॉम बेसवर इंग्लंडची भिस्त असणार आहे. तर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत या तिघांमध्ये फिरकीविरोधात आक्रमक खेळ करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा सामना अजूनही भारताच्या हातात आहे, असं म्हणता येईल.

लोकल बॉय अश्विनचा शानदार ‘सिक्सर’

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या एकूण 6 फलंदाजांना बाद केलं. या कामगिरीसह अश्विनने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. अश्विनने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या एकूण 6 फलंदाजांना बाद केलं. अश्विनने रॉरी बर्न्स, डोमिनिक सिबले, बेन स्टोक्स, डोम बेस, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनला बाद केलं. अश्विनने कसोटी कारकिर्दीत एकूण 28 वेळा 5 किवां त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे चेन्नईच्या या मैदानात अश्विनने 3 वेळा तर इंग्लंड विरुद्ध चौथ्यांदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. यासह अश्विन टेस्टमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा 8 वा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने इयॉन बॉथमला पछाडत ही कामगिरी केली आहे. बॉथमने एकूण 27 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

संबंधित बातम्या

India vs England 1st Test | इशांत शर्माचा किर्तीमान, मानाच्या पगंतीत स्थान

वॉशिंग्टनची नाबाद 82 धावांची ‘सुंदर’ खेळी, इतर खेळाडूंमुळे शतकाची संधी हुकली, नेटकऱ्यांकडून संताप

(Chennai Test Report : England Set record 420 runs Target for India)