
मुंबई: भारताचा झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौरा संपला आहे. आता टीम इंडियासमोर आशिया कप स्पर्धा आहे. 28 ऑगस्टला भारत पाकिस्तान विरुद्ध अभियान सुरु करणार आहे. या मोठ्या सामन्याआधी भारताला त्याचे 3 संकटमोचकच अडचणीत आणू शकतात. पाकिस्तान विरुद्धच्या (IND vs PAK) सामन्याआधी भारतासाठी स्वत:चे हे तीन स्टार त्रासदायक ठरु शकतात. केएल राहुल, (KL Rahul) विराट कोहली आणि आवेश खान यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. कधी या खेळाडूंना संकटमोचक म्हटलं जायच. पण आता ते संघाच्या अडचणी वाढवत आहेत. सामन्याआधी तिघांच फॉर्म मध्ये परतणं आवश्यक आहे. कारण या तिघांचा खराब फॉर्म भारतीय संघाला अडचणीत आणू शकतो.
भारतासाठी सर्वात चिंतेचा विषय आहे, विराट कोहलीचा खराब फॉर्म. मागच्या बऱ्याचकाळापासून विराट कोहली त्याच्या फॉर्मवरुन चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. तेव्हापासून तो ब्रेकवर आहे. आशिया कप स्पर्धेपासून कोहली मैदानावर पुनरागमन करणार आहे. प्रत्येकाच्या मनात आजही कोहलीच्या फॉर्मवरुन चिंता आहे. ब्रेकवरुन परतल्यानंतर विराट कोहलीला त्याला हरवलेला सूर सापडणार? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कोहली वेळीच फॉर्म मध्ये परतला नाही, तर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या अडचणी वाढू शकतात. भारताची सलामीची जोडी दुबळी वाटतेय.
भारताची अडचण ओपनिंग पासून सुरु होत आहे. गोलंदाजी पर्यंत समस्या कायम आहे. केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता. फिट झाल्यानंतर झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीज मधून त्याने पुनरागमन केलं. पण त्याची बॅट चालली नाही. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात तो अवघ्या 1 रन्स आणि तिसऱ्या सामन्यात 30 धावांवर आऊट झाला. त्याने जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवणं आवश्यक होतं. पण असं होऊ शकलं नाही. पाकिस्तान विरुद्ध राहुल भक्कम सुरुवात दिली नाही, तर डाव सांभाळण कठीण होईल.
आवेश खान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधीपासूनच अडचण बनला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध त्याला एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने 66 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. तो महागडा गोलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये तो फ्लॉप ठरला होता. तिथे त्याने 4 सामन्यात 115 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. तो धावा देत असल्याने त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.