Team India : इंडियाला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू निर्णायक सामन्यातून आऊट, कुणाचा समावेश?

Indian Cricket Team : बीसीसीआयने सामन्याच्या काही तासाआधी टीम इंडियाची मॅचविनर खेळाडू एकमेव मात्र निर्णायक सामन्यातून बाहेर झाल्याचं सांगितलं आहे. जाणून घ्या त्या खेळाडूच्या जागी कुणाला संधी मिळालीय.

Team India : इंडियाला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू निर्णायक सामन्यातून आऊट, कुणाचा समावेश?
India Women Cricket Team
Image Credit source: Getty
| Updated on: Mar 04, 2026 | 8:20 PM

मेन्स टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मायदेशात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत खेळत आहे. गतविजेत्या टीम इंडियाने उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली आहे. टीम इंडियासमोर उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडचं आव्हान असणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी सूर्यासेनेकडून जोरदार सराव केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडियाच्या गोटातून मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्याला मुकावं लागलं आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्या खेळाडूच्या जागी कुणाचा समावेश करण्यात आला आहे हे आपण जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. आता उभयसंघात 6 मार्चपासून एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या एकमेव सामन्यातून भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकुर बाहेर झाली आहे. बीसीसीआय वूमन्स एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

वर्कलोडमुळे विश्रांती, कुणाला संधी?

रेणुकाला वर्कलोड मॅनजमेंटमुळे या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. रेणूकाच्या जागी काश्वी गौतम हीचा समावेश करण्यात आला आहे. काश्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी 20i आणि एकदिवसीय मालिकेचा भाग होती. काश्वीने टी 20i सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांना बाद केलं. तर वनडेत 1 विकेट मिळवली.

रेणूका सिंह ठाकुर आऊट

बीसीसीआयने काय सांगितलं?

रेणुका सिंह एकमेव कसोटी सामन्यातून बाहेर आहे. वर्कलोडमुळे तिला विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे रेणुका ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकमेव सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नसणार, अशी माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असेल, असंही बीसीसीआयने सांगितलं आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करणार?

दरम्यान उभयसंघातील एकमेव कसोटी सामना हा 6 मार्चपासून पर्थमधील वाका ग्राउंडमध्ये होणार आहे. हा सामना पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. अशात आता टीम इंडिया हा क्रिकेट सामना जिंकून दौऱ्याचा शेवट विजयाने करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us