आयपीएल स्पर्धेत होणार मोठा बदल! क्रिकेट फॅन्ससाठी बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, काय ते जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची लोकप्रियता जगभर पसरली आहे. या लीग स्पर्धेत खेळण्यासाठी दिग्गज खेळाडू उत्सुक असतात. सध्या आयपीएलचं 18वं पर्व सुरु असून यात एक बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय असल्याचं दिसून येत आहे.

आयपीएल स्पर्धेत होणार मोठा बदल! क्रिकेट फॅन्ससाठी बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, काय ते जाणून घ्या
कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स
Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Apr 28, 2025 | 5:34 PM

आयपीएल 2025 स्पर्धा अर्थात 18वं पर्व आता रंगतदार वळणावर आली आहे. 46 सामन्यांचा खेळ संपल्यानंतर प्लेऑफची लढाई चुरशीची झाली आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालाचा परिणाम गुणतालिकेवर थेट होताना दिसत आहे. असं सर्व सुरु असताना बीसीसीआयच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आहे. आयपीएल स्पर्धेत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी आयपीएल स्पर्धेतील मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी लवकरच एक मोठा बदल केला जाणार आहे. यामुळे क्रीडारसिकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आयपीएल 2028पासून आयपीएल स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या आयपीएल स्पर्धेत अंतिम फेरीसह 74 सामने खेळले जात आहे. मात्र 2028 पासून आयपीएल स्पर्धेत 94 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धा जवळपास दोन महिने चालते. त्यामुळे 94 सामन्यांचा वेळापत्रक बसवण्यासाठी तजवीज करावी लागणार आहे. जास्तीत जास्त डबल हेडर सामने खेळवावे लागण्याची शक्यता आहे.

आयपीएलमध्ये नवा संघ खेळण्यास येईल की नाही याबाबत अजून काही स्पष्टता नाही. दरम्यान, आयपीएल 2025 स्पर्धेत 84 सामने खेळवण्याचा विचार सुरु होता. मात्र प्रत्यक्षात तसं करणं शक्य झालं नाही. डबल हेडर सामन्यांची संख्या पाहता तसं करता आलं नाही. आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी ईएसपीएलन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं की, बीसीसीआय पुढच्या मिडिया राइट्स चक्रापासून 94 सामन्यांच्या फॉर्मेटबाबत विचार करत आहे. हे चक्र 2028 पासून सुरु होणार आहे. आम्ही याबाबत आयसीसीसोबत चर्चा करत आहोत. तसेच बीसीसीआयमध्ये यााबबत चर्चा होत आहे.

अरूण धूमलने सांगितलं की, ‘आदर्शपणे आम्हाला एक मोठी खिडकी हवी आहे, जेणेकरून प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर प्रत्येक संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, यासाठी तुम्हाला 94 सामने आवश्यक आहेत.’ संघांची संख्या वाढवण्याबद्दल बोलताना अरुण धुमल म्हणाले की, ‘सध्या दहा संघाची संख्या चांगली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेतील रस आणि क्रिकेटचा दर्जा चांगला आहे.”