टी20 वर्ल्डकपपूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरने बरंच काही सांगितलं, ऑस्ट्रेलियाचं आव्हान आणि…

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेपूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर पत्रकार परिषदेला सामोरं गेली. यावेळी तिने जेतेपदाबाबत आपलं मन मोकळं केलं.

टी20 वर्ल्डकपपूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरने बरंच काही सांगितलं, ऑस्ट्रेलियाचं आव्हान आणि...
| Updated on: Sep 24, 2024 | 7:22 PM

भारताच्या पुरुष संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. तशीच अपेक्षा आता भारतीय महिला संघाकडून आहे. भारतीय महिला संघाने अद्याप एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा तरी जेतेपद मिळवतील अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर विश्वास व्यक्त केला की, भारतीय संघात जेतेपद मिळवण्याची क्षमता आहे. आयसीसीच्या पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, ‘आमचं एकच लक्ष्य असून आम्ही देश आणि आमच्या चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करू. क्रीडारसिक आम्हाला बिनशर्त पाठिंबा देतात. मग आम्ही हा सामना कुठेही खेळत असलो तरी ते आमच्या पाठीशी उभे राहतात.’ हरमनप्रीत कौरने युएईत पहिल्यांदाच खेळणार असल्याने उत्साहित असल्याचं सांगितलं. ‘मला पूर्ण विश्वास आहे की दुबई आणि शारजाहमध्ये खेळताना मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील.’

भारतीय महिला संघाने 2020 साली अंतिम फेरीत धडक मारली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. याबाबत हरमनप्रीत कौरला विचारलं असता म्हणाली की, ‘या स्पर्धेसठी आमची तयारी मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेपासूनच सुरु झाली होती.’ या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असेल याची कबुली तिने दिली. ‘आम्ही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतो यात काहीच शंका नाही. मला वाटते की हा एक सकारात्मक संकेत आहे. आम्हाला माहिती आहे की, जेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात खेळतो तेव्हा आम्ही त्यांना कधीही पराभूत करू शकतो. आमचा चांगला संघ असल्याचं त्यांना माहिती आहे. आम्ही चांगलं क्रिकेट खेळू इच्छितो.’

‘ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे. मला वाटते असं कर्ण्याची क्षमता आमच्या संघात आहे. आम्ही ऑस्ट्रेलियात 2020 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलो होतो. दक्षिण अफ्रिकेतही 2023 अंतिम फेरीच्या जवळपास पोहोचलो होतो. यावरून मोठ्या स्पर्धेचं जेतेपद जिंकण्याची क्षमात संघाकडे आहे हे दिसून येतं’, असंही हरमनप्रीत कौर हीने सांगितलं. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 ऑक्टोबरला सामना होणार आहे.

Follow Us