Sonal Dinusha: सर्वाधिक धावा आणि शतकं तरीही सोनल दिनुषासोबत अन्याय! नेमकं काय घडलं?
भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. खरं तर मालिकेचा निकाल आणखी वेगळा असता. पण सोनल दिनुषाने केलेल्या खेळीमुळे दुसरा सामना ड्रॉ झाला. त्याने दोन्ही सामन्यात शतकी खेळी केली. पण तरीही त्याच्यावर अन्याय झाला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

भारताचं दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाचं गणित जर कोणामुळे भंगलं असेल ते सोनल दिनुषामुळे.. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात झुंजार खेळी केली आणि टीम इंडियाला विजयापासून रोखलं. नुसतं दुसऱ्या डावात नाही तर पहिल्या डावातही त्याची झुंजार खेळी महत्त्वाची ठरली. इतकंच काय तर पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात त्याने जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे तीन शतकं, सर्वाधिक धावा करूनही त्याच्यावर पुरस्कारावेळी अन्याय झाल्याची भावना आहे. कारण मालिकावीराचा पुरस्कार देवदत्त पडिक्कलला देण्यात आला. सोनल दिनुषाला सामनावीराचा पुरस्कार देऊन तोंडाला पानं पुसण्यात आली, असं क्रीडाप्रेमींंचं म्हणणं आहे. खरं फलंदाजीच्या कामगिरीत दिनुशाने पडिक्कलला बरंच मागे टाकलं होतं. सोनलने दोन सामन्यांमध्ये 140 च्या सरासरीने 420 धावा केल्या होत्या.
सोनल दिनुषाने गॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक ठोकलं होतं. या सामन्याच्या दुसर्या डावात 84 धावा केल्या. त्यानंतर कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात 103 धावा केल्या. तर दुसऱ्या डावातही शतकी खेळी केली. इतकंच काय तर सोनलने मालिकेत सर्वाधिक 8 षटकार मारले. त्याची फलंदाजीची सरासरीही चांगली होती. दुसरीकडे, देवदत्त पडिक्कलने दोन्ही सामन्यात एकूण 328 धावा केल्या. गॉल आणि कोलंबो कसोटी शतकं ठोकलं. पण त्याने ही कामगिरी फक्त तीन डावात केली होती. कारण श्रीलंकेला फॉलोऑन दिल्याने चौथ्या डावात खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, क्रिकेटच्या इतिहासात मालिकावीर निवडताना पराभूत किंवा ड्रॉ झालेल्या संघातील खेळाडूची कामगिरी कितीही सरस असली, तरी मालिका जिंकणाऱ्या संघाच्या मुख्य खेळाडूला प्राधान्य देण्याची पद्धत आहे.
काय म्हणाला सोनल दिनुषा?
सोनल दिनुषा म्हणाला की, ‘मला तळाच्या फलंदाजांचा उल्लेख करायला आवडेल. ते खूप छान फलंदाजी करत होते. त्यामुळे मला धावा काढायला खूप मदत झाली. मला वाटतं की मी परिस्थितीचा अंदाज घेऊन माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिकरित्या मला याचा खूप आनंद आहे. पण मला वाटतं की, जेव्हा संघ अडचणीत असतो, तेव्हा मला संघासाठी धावा करायच्या होत्या. तर मी फक्त तेवढंच केलं. त्यामुळे सरतेशेवटी मी खूप आनंदी आहे., भारताविरुद्ध धावा करणं, एक खेळाडू म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे.