
मुंबई | आशिया कप 2023 साठी बीसीसीआयने 21 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने 17 सदस्यीय संघ जाहीर केला. रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. या टीममध्ये फिरकीपटू युझवेंद्र चहल याला स्थान देण्यात आलं नाही. चहलला टीममध्ये घेणं कॅप्टन म्हणून रोहितला योग्य वाटलं नाही. चहलला संधी न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण याने प्रश्न उपस्थित केले. आता आपल्या नवऱ्याला संधी न दिल्याने धनश्री वर्मा हीने प्रतिक्रिया दिली आहे. चहलला संधी न मिळाल्याने धनश्री चांगलीच संतापलीय. धनश्रीने एक सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
धनश्रीने इंस्टाग्रामवर स्टोरीद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मी आता याबाबत गंभीरतेने प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. फार विनम्र आणि अंतर्मुख असणं हे तुमच्या विकासात आड येतं का? तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी एक्सट्रोवर्ट आणि प्रमाणापेक्षा समजदार असणं गरजेचं आहे का?”, असा शब्दात धनश्रीने नाराजी व्यक्त केली आहे.
धनश्रीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे चहलसोबत अन्याय झालाय का, अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच चहलला कामगिरीच्या आधारावर नसून स्वभावामुळे बाहेर केलं गेलंय का? चहलच्या जागी ज्याची निवड केली, त्याचे टीम मॅनेजमेंटसोबत चांगले नाते आहेत का? धनश्रीने उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन तरी असच स्पष्ट होतं की, कामगिरीमुळे नाही, तर चहलला तगड्या पीआरअभावी बाहेर ठेवण्यात आलंय.
आता चहलला टीममध्ये संधी न देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं जात आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान टीम लेग स्पिनर्सना अधिकाअधिक संधी देतेय. तर टीम इंडियाने सोबत फक्त एकच लेग स्पिनर ठेवला आहे. युझवेंद्र चहल याला तसंही गेल्या अनेक महिन्यांपासून वनडे प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नव्हती. त्यामुळे चहलला आशिया कपमध्येही खेळवण्यात येणार नसल्याचा अंदाज बांधला जात होता आणि तसंच झालं.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)