ENG vs IND : 41 धावांत 7 झटके, टीम इंडियाला 471वर रोखलं, इंग्लंडचं जोरदार कमबॅक

Team India 1st Innings Against England in 1st Test : टीम इंडियासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत या त्रिकुटाने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

ENG vs IND : 41 धावांत 7 झटके, टीम इंडियाला 471वर रोखलं, इंग्लंडचं जोरदार कमबॅक
Ben Stokes and Shubman Gill Yashasvi Jaiswal
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 21, 2025 | 7:54 PM

इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी लीड्समध्ये 500 धावा करण्यापासून रोखलंय. इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 471 धावांवर ऑलआऊट केलं आहे. टीम इंडियासाठी ओपनर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 600 पार जाण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी  जोरदार कमबॅक करत 500 धावांआधीच रोखलं. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील या तिघांशिवाय केएल राहुल याने 42 धावांची खेळी केली. मात्र याशिवाय इतरांना काही करता आलं नाही. त्यामुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरली.

भारताची फलंदाजी

केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. केएल 42 धावा करुन आऊट झाला. तर डेब्यूटंट साई सुदर्शन याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर यशस्वी आणि कर्णधार शुबमन गिल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 163 बॉलमध्ये 129 रन्सची पार्टनरशीप केली. भारताने यशस्वीच्या रुपात तिसरी विकेट गमावली. यशस्वीने इंग्लंडमध्ये पहिल्याच सामन्यात पहिलं आणि एकूण पाचवं शतक ठोकलं. यशस्वीने 159 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारांसह 101 धावा केल्या.

त्यानंतर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 359 धावा केल्या. कर्णधार शुबमन आणि उपकर्णधार ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली. पंत-गिलने चौथ्या विकेटसाठी 199 चेंडूत 138 धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान गिलने शतक आणि पंतने अर्धशतकं झळकावलं.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

दुसऱ्या दिवशी पंतने 65 तर गिलने 127 धावांपासून खेळायला सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आणखी 71 धावा जोडल्या. पंतने या भागीदारी दरम्यान 100 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत कसोटी कारकीर्दीतील सातवं शतक ठरलं. मात्र त्यानंतर शुबमन गिल मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला आणि ही जोडी फुटली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 303 बॉलमध्ये 209 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमनची कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात दीडशतक करण्याची संधी अवघ्या 3 धावांनी हुकली. शुबमनने 227 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांसह 147 धावा केल्या.

..आणि टीम इंडियाची पडझड

शुबमन आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 4 आऊट 430 असा झाला. मैदानात पंत होता. तर टीम इंडियाचे अनेक खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात येणं बाकी होते. भारताच्या हातात विकेट्स असल्याने सहज 600 पार जाता येईल, अशी स्थिती होती. मात्र इंग्लंडने इथून कमबॅक केलं. इंग्लंडने टीम इंडियाला झटपट झटके दिले आणि 500 धावाही करुन दिल्या नाहीत.

शुबमननंतर करुण नायर मैदानात आला. करुण टीम इंडियासाठी 3 हजार 5 दिवसांनी मैदानात आला. मात्र करुण दुर्देवी ठरला. ओली पोपने हवेत झेप घेत अप्रतिम कॅच घेतला. त्यामुळे करुणला झिरोवर मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर टीम इंडियाने धडाधड विकेट्स टाकल्या. पंत 134 धावांवर आऊट झाला. पंतने 178 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 12 फोरसह 134 रन्स केल्या.

भारताच्या पहिल्या डावात 471 धावा

पंत आऊट झाल्यानंतर ऑलराउंडर शार्दूल ठाकुरकडून अपेक्षा होती. मात्र शार्दूल 1 धावकरुन मैदानाबाहेर परतला. जसप्रीत बुमराहला भोपळाही फोडता आला नाही. रवींद्र जडेजाने 11 धावा केल्या. तर प्रसिध कृष्णा 1 धावेवर आऊट झाला आणि भारताचा डाव 113 षटकांमध्ये आटोपला. इंग्लंडसाठी कॅप्टन बेन स्टोक्स आणि जोश टंग या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर बार्यडन कार्स आणि शोएब बशीर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.