गौतम गंभीरने या खेळाडूची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली मागणी! कोण ते जाणून घ्या

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असून मुख्य प्रशिक्षकपदाची खलबतं बीसीसीआयमध्ये सुरु होती. राहुल द्रविडचा कार्यकाळ टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंतच होता. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मण हा अंतरिम प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. तर गौतम गंभीर याचं नाव प्रशिक्षपदी जाहीर झालं आहे.

गौतम गंभीरने या खेळाडूची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली मागणी! कोण ते जाणून घ्या
Gautam Gambhir
| Updated on: Jul 09, 2024 | 8:18 PM

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची जागा कोण घेणार? याची चर्चा सध्या जोरात आहे. वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असलेल्या माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचं नाव अखेर बीसीसीआयने घोषित केलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना त्याने बीसीसीयसमोर मुलाखतही दिली होती. त्यामुळे त्याचं नाव जवळपास निश्चित होतं आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता गौतम गंभीरने बीसीसीआयकडे एक मागणी ठेवल्याची माहिती पुढे येत आहे. यात मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडूची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून मागणी केली आहे. गौतम गंभीरने अभिषेक नायर याची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्याची मागणी केल्याचं बांगला न्यूजपेपर आजकलने सांगितलं आहे. गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेंटॉरपदी असताना नायर सहाय्यक प्रशिक्षक होता. या जोडीने केकेआर आयपीएल जेतेपद मिळवून देण्याच मोलाची भूमिका बजावली.

रिपोर्टनुसार, गौतम गंभीर आणि नायर यांनी या पदाबाबत आधीच तोंडी करार केल्याचं बोललं जात आहे. गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर नायर कोचिंग स्टाफमध्ये असेल यात शंका नाही. गौतम गंभीरला याबाबत प्रश्न विचारलं असता त्याने सांगितलं की, “मी फार पुढचा विचार करत नाही. तुम्ही मला असे प्रश्न विचारू नका. तुम्ही मला कठीण प्रश्न विचारत आहात. या प्रश्नाचं आता उत्तर देणं खूप कठीण आहे. मी फक्त एवढेच सांगू शकतो की मी येथे येऊन आनंदी आहे. नुकताच एक शानदार प्रवास पूर्ण केला.चला त्याचा आनंद घेऊया. मी सध्या खूप आनंदी वातावरणात आहे.”

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा साडे तीन वर्षांचा असणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत हा कार्यकाळ सांभाळावा लागणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टेस्ट चॅम्पियनशिप 2025, टी20 वर्ल्डकप, आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या चषकावर टीम इंडिया नाव कोरणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. दरम्यान, गौतम गंभीर हा 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चा भाग होता. तसेच त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपद मिळवलं आहे. तर एकदा मेंटॉर असताना जेतेपदाला गवसणी घातली आहे.