weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं कमबँक झालं आहे. शनिवारी राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे, दरम्यान आता हवामान विभागाकडून राज्याला मोठा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एक जुलै ते आठ जुलै दरम्यान चांगला पाऊस झाला होता, या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर पावसाने तब्बल दहा दिवस दडी मारल्यामुळे पिकं संकटात आली होती, शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु आता आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, शुक्रवारी देखील काही भागात पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे. तब्बल तेरा राज्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुसळधार पावसासोबतच प्रति तास 80 ते 90 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे, तर पूर्व भारतात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
या राज्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू -काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगड या रांज्याना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग प्रति तास 80 ते 90 किलोमीटर एवढा प्रचंड असणार आहे, त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, तसेच या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असं आवाहनाही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होत आहे. राज्यात आता पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या वीस जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
