GT vs MI Qualifier 2, IPL 2023 : मुंबई इंडियन्स जिंकू शकली असती, ‘या’ चुका भोवल्या; पराभवाला रोहित शर्माही जबाबदार!

| Updated on: May 27, 2023 | 7:41 AM

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल मुंबई विरुद्ध गुजरात असा सामना रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरातने मुंबईच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. गुजरातने धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. त्यापुढे मुंबईच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले.

GT vs MI Qualifier 2, IPL 2023 : मुंबई इंडियन्स जिंकू शकली असती, या चुका भोवल्या; पराभवाला रोहित शर्माही जबाबदार!
Mumbai Indians
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद : गुजरात विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठा पराभव पत्कारावा लागला. आयपीएलमध्ये चांगला जम बसवून क्वालिफायरमध्ये पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सचं गणित बिघडलं अन् मुंबईला फायनलमधून बाहेर पडावं लागलं. गुजरातविरुद्धच्या सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला कोणत्या चुका भोवल्या? कालच्या पराभवाला कर्णधार रोहित शर्माही जबाबदार कसा? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

पाचव्यांदा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा जेता होण्याचं स्वप्न भंगलं. क्वालिफायर -2 मध्ये गुजरातने मुंबईला 62 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे गुजरात फायनलमध्ये पोहोचला. आता फायनलमध्ये गुजरातची भिडत चेन्नईशी होणार आहे. मुंबईचं फायनलमध्ये जाण्याचे दोर कापले गेले आहेत.

हे सुद्धा वाचा

झेल सुटला अन् शुभमन सुटला…

कालच्या सामन्यात गुजरातचा तडाखेबाज फलंदाज शुभमन गिलने 129 धावांची उत्तुंग खेळी केली. त्यामुळे गुजरातचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला. मात्र, शुभमनला आधीच रोखलं जाऊ शकलं असतं. सहाव्या ओव्हरमध्ये मिड ऑनला टिम डेव्हिडने शुभमनचा झेल पकडला असता तर शुभमन स्वस्तात बाद झाला असता अन् खेळ पालटला असता. मात्र, शुभमनची कॅच सोडणं मुंबईला महागात पडलं. त्यानंतर गिलने आयपीएलमधील त्याची सर्वश्रेष्ठ खेळी खेळली.

खेळाडू दुखापतीने बेजार

मुंबईला 234 धावांचं टार्गेट मिळालं. त्यामुळे मुंबईच्या फलंदादाजांनी संयत आणि आक्रमक खेळीचा मिलाफ घडवत धावांचा पाठलाग करणं अपेक्षित होतं. पण मुंबईचे दोन फलंदाज दुखापतग्रस्त झालेले होते. गुजरातची खेळी सुरू असताना क्रिस जॉर्डनच्या कोपराला आणि इशान किशनच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते फलंदाजी करायला आले नाहीत. दुसरीकडे कॅमरन ग्रीन सुद्धा मोहम्मद शमीच्या चेंडूवर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तोही मैदानाबाहेर गेला. नंतर तो परत आला. पण संघासाठी खास काही करू शकला नाही.

रोहितने बॅट टेकवली

अशी अवस्था असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपण्याची गरज होती. मात्र, रोहित शर्मा या सामन्यात सुपर फ्लॉप ठरला. अवघ्या आठ धावा करून तो बाद झाला. रोहितनंतर इतर फलंदाजांनीही निराशा केली. कोणीही मोठी भागिदारी करू शकला नाही. त्यामुळे मुंबईला निर्धारित लक्ष्य गाठता आलं नाही.

वाईट गोलंदाजी

मुंबईच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे बेक्कार गोलंदाजी. मुंबईच्या गोलंदाजांनी अत्यंत वाईट गोलंदाजी केली. त्यामुळे गुजरातच्या फलंदाजांनी गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करत धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे मुंबईला त्यांच्याच चुकांमुळे निर्माण झालेला धावांचा डोंगर पार करता करता नाकीनऊ आले.