गर्भवती महिलेला टाके घातल्यानंतर इन्फेक्शन,रुग्णालयावर हलगर्जीचा आरोप
कल्याण येथील रुक्मिणी रुग्णालय, डोंबिवलीचे शास्रीनगर रुग्णालय, कळवा येथील रुग्णालये येथील रुग्णसेवा मरणपंथला लागली आहे.

प्रसुतीनंतर एका महिलेला टाके घालताना इन्फेक्शन झाल्याची घटना टिटवाळा येथील रुग्णालयात घडली आहे. ही महिला प्रसुत झाल्यानंतर तिला घातलेले टाकले न सुकता चिघळल्याने पोटात पस झाल्याने या महिलेवर आता कल्याण-डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेच्या आईने आरोप केला आहे की टिटवाळा येथील डॉक्टरांनी नीट टाके न घातल्याने आपल्या मुलीला असह्य वेदना होत आहेत. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
टिटवाळा येथे एका महिलेवर प्रसुतीसाठी शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी तिच्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. या महिलेला कल्याण-डोंबिवली येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या रुग्णालयात या महिलेचे टाके उसवून पुन्हा घालण्याची शस्रक्रिया होणार होती. मात्र, येथील डॉक्टरांनी पोटातील इन्फेक्शन पूर्ण बरे झाल्याशिवाय टाके पुन्हा घालण्यास असमर्थता दर्शविल्याचे या महिलेने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. येथील डॉक्टर आपल्याला म्हणाले की तुम्हाला टिटवाळा येथील डॉक्टरांनी सांगितले नाही का तुमच्या टाक्यात इन्फेक्शन आहे असे पीडीत महिलेने सांगितले.
मुलीचे वेदनेने ओरडणे पाहावत नाही…
या पीडीत महिलेची आईने डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप केला आहे. माझी मुलीचे टाके अर्धवट काढून तसेच ठेवण्यात आले आहेत. रोज तिचे ड्रेंसिंग सुरु असताना ती वेदनेने रडत असते. तिचे रडणे मी सहन करु शकत नाही, मी तिची आई आहे. या हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करावी अशी मागणी या पीडीत महिलेच्या आईने केली आहे.
नुकतेच शास्रीनगरच्या कल्याण-डोंबिवली येथील रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी लहान बालकाला अॅडमिट करण्यास नकार दिल्याने डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
महामुंबईतील वैद्यकीय सेवा गॅसवर
कल्याण येथील रुक्मिणी रुग्णालय, डोंबिवलीचे शास्रीनगर रुग्णालय, कळवा येथील रुग्णालये येथील पेशंटचा भार प्रचंड मोठा आहे. येथील रहिवाशांना मुंबईतील केईएम,मुंबई रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जे.जे.रुग्णालय गाठावे लागते. मात्र, तेथील अवस्था याहून भयानक आहे. रुग्णांची प्रतिक्षा यादी पाहूनच पेशंटचे अवसान गळते अशी अवस्था सर्वाधिक ओपीडी सांभाळणाऱ्या केईएम रुग्णालयाची झाली आहे. राज्य सरकार येथील रुग्णालयाची डॉक्टरांची संख्या, सेवेचा दर्जा, औषधे वाढवण्याच्या ऐवजी त्याचे नामकरण करण्यात जास्त बिझी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
