
आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 2007 पासून सुरुवात केली. या स्पर्धेचं पहिलं पर्व हे दक्षिण अफ्रिकेत पार पडलं आणि भारताने जेतेपदावर नाव कोरलं. पण या टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं नाव तेव्हा ‘वर्ल्ड टी-20’ असं होतं. काही पर्व याच नावासह गाजली. पण 2020 मध्ये या स्पर्धेचं नाव बदललं गेलं. पुरूष आणि महिला या दोन्ही टी20 स्पर्धेच्या नावात आयसीसीकडून बदल करण्यात आला. पण नाव बदलून काय मिळालं? असा निर्णय घेण्याचं कारण काय? वगैरे अनेक प्रश्न तेव्हा उपस्थित केले गेले होते. काळाच्या ओघात नाव बदलल्याची चर्चाही संपली. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. जर तुम्हाला या बदललेल्या नावामागचं लॉजिक माहिती नसेल, तर पुढे तुम्हाला त्याची माहिती मिळेल.
आयसीसीने या स्पर्धेचं नाव टी20 वर्ल्डकप स्पर्धा केल्यानंतर सांगितलं होतं की, नवं नाव जागतिक व्यासपीठावर स्पर्धेचं प्रोफाईल आणखी भक्कम करेल. जागतिक क्रिकेटच्या रणनितीनुसार हे नाव बदललं असल्याचं प्रशासकीय मंडळाने सांगितलं. टी20 क्रिकेटचं जागतिक पातळीवर महत्त्व वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. आयसीसीने स्पष्ट करत सांगितलं होतं की, नावातील बदलामुळे स्ट्रक्चरल बदलही दिसून येतात. यात सदस्य संघांना टी20 सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा देणे आणि 100हून अधिक आयसीसी सदस्यांना प्रादेशिक पात्रता मार्ग सुरू करण्याचा हेतू होता. त्याचेच परिणाम आता दिसून येत आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी गेल्या काही वर्षात पात्रता फेरी सुरू झाली आहे. तसेच संघांची संख्या 20 वर पोहोचली आहे. सलग दुसऱ्या पर्वात 20 संघ खेळत आहेत. कदाचित पुढे जाऊन या संघांची संख्या वाढू शकते. आयसीसी टी20 स्पर्धेपुढे वर्ल्डकप हे नाव देऊन जागतिक वाढीसाठी व्यासपीठ दिलं आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटचा जागतिक पातळीवर वेगाने प्रसार होईल. दुसरीकडे, वनडे म्हणजे 50 षटकांच्या क्रिकेटचं नाव आधीच वनडे वर्ल्डकप ठेवलं आहे. तसेच नुकतीच सुरू झालेल्या कसोटी स्पर्धेचं नाव वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ठेवलं आहे.