टीम इंडिया बाहेर असलेल्या सरफराज खानच्या क्रिप्टीक पोस्टमुळे खळबळ, मी फिट बसत नाही, पण….!
भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. या मालिकेसाठी सरफराज खानला संघात स्थान मिळालं नाही. असं असताना त्याची इंस्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकं काय लिहिलंय ते जाणून घेऊयात..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं भारताचं गणित खूपच किचकट झालं आहे. त्यामुळे भारताला श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. 15 ऑगस्टला पहिला कसोटी सामना गॉलमध्ये खेळला जाणार आहे. असं असताना टीम इंडिया बाहेर असलेल्या फलंदाज सरफराज खानची इंस्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सरफराज खानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. त्यावर एक संदेश आहे की, ‘कदाचित मी फिट बसत नाही, पण मी माझ्या संपूर्ण ताकदीनिशी लढणार.’ सरफराज खानचे दोन वाक्य क्रिकेटविश्वात वादळ घेऊन आलं आहे. कारण त्याने या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीचा किंवा निवडीचा संदर्भ दिलेला नाही. पण त्याचे चाहते काय अंदाज बांधायचा तो बांधत आहेत.
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना पोस्ट
भारतीय संघाला सध्या दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेला मुकला आहे. त्यानंतर साई सुदर्शनचं फिटनेस काय त्याबाबत अजून अपडेट नाही. त्यात कर्णधार शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने सराव सामन्यात उतरला नाही. असं टीम इंडियाचं चित्र असताना सरफराज खानची क्रिप्टिक पोस्ट चर्चेचा विषय ठरणार तर काय? नेटकरी या क्रिप्टिक पोस्टचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
सरफराज खानने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं होतं. पण त्याला फार काही संधी मिळाली नाही. आतापर्यंत सहा कसोटी सामन्यातील 11 डावात 371 धावा केल्या आहेत. त्याने 37.10 च्या स्ट्राईक रेटने 74.97 धावा केल्यात. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. सरफराज शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या कसोटी सामन्यात सरफराज खान 0 आणि 1 अशा धावसंख्येवर बाद झाला होता.
दुलीप ट्रॉफीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा
सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळालं नसलं तर देशांतर्गत क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. वेस्ट झोन संघाकडून मैदानात उतरणार आहे. या संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. तर शम्स मुलानी उपकर्णधार आहे. या संघात पृथ्वी शॉ, सरफराज खान, मुशीर खान आणि शार्दुल ठाकुर आहे. या स्पर्धेत या सर्व खेळाडूंना सिद्ध करण्याची संधी आहे. सरफराज खानने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि फिटनेस सिद्ध केलं तर नक्कीच त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं खुली होतील.