
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सराव सामन्यात पीएम इलेव्हनवर 6 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. एकूण 2 दिवसीय सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यानंतर 1 डिसेंबरला 50 ओव्हरचा खेळ होणार असल्याचं निश्चित झालं. मात्र सामना सुरु झाल्यानंतर पावसाने खोडा घातल्याने 4 षटकं कमी करण्यात आली. त्यामुळे 46 ओव्हरचा गेम होणार असल्याचं निश्चित झालं. पीएम ईलेव्हनला टॉस गमावून बॅटिंग करावी लागली. सॅम कोन्स्टास याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पीएम ईलेव्हनला ऑलआऊट 240 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताला विजयसाठी 241 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. तसेच विजयानंतरही सामना सुरुच होता. टीम इंडियाने 46 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 5 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. टीम इंडियासाठी शुबमन गिल याने सर्वाधिक 50 धावा केल्या. मात्र या विजयानंतरही खंत व्यक्त करत टीम दुर्देवी असल्याचं म्हटलं.
“आम्हाला जे एक टीम म्हणून जे अपेक्षित होतं ते मिळालं. आम्ही थोडे दुर्देवी ठरलो. पूर्ण खेळ खेळण्याची संधी मिळाली नाही, याची आम्हाला खंत आहे. आम्हाला जो काही वेळ मिळाला त्याचा आम्ही पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच आम्ही आमच्यासमोर जे होतं ते मिळवण्याचा प्रयत्न केला”, असं रोहितने सामन्यानंतर म्हटलं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा आणि दिवस रात्र सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान एडलेड ओव्हल येथे होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.