IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

| Updated on: Aug 08, 2021 | 9:24 PM

भारत आणि इंग्लंड (India Vs England) या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित सुटली आहे.

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित
Nottingham
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India Vs England) या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित सुटली आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 98 षटकांमध्ये 157 धावांची आवश्यकता होती. भारताच्या 9 विकेट शिल्लक होत्या. परंतु आज सकाळपासूनच नॉटिंगहॅममध्ये पाऊस सुरु होता. पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. परंतु चहापानानंतर पाऊस ओसरण्याऐवजी त्याने अधिक जोर धरला. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय संघांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला आहे. दरम्यान, पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या जो रुटला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (IND vs ENG, 1st Test : Play abandoned due to heavy rain, match ends in a draw)

पहिल्या डावात इंग्लंडला 183 धावांमध्ये रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात 278 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 303 धावा जमवल्या. पहिल्या डावात भारताला 95 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताला 121 षटकांमध्ये 209 धावांचं लक्ष्य मिळालं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी काल (सामन्याच्या चौथ्या दिवशी) भारतीय संघ मैदानात उतरला. चौथ्या दिवसअखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद होते. आज भारताला 98 षटकांमध्ये 157 धावा करण्याचे लक्ष्य होते. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ सुरु करता आला नाही. परिणामी उभय संघांमध्ये पहिली कसोटी अनिर्णित राहिली आहे.

जो रुटला सामनावीराचा पुरस्कार

भारत आणि इंग्लंड संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. दोन्ही डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रुटने मात्र दोन्ही डावात खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात अर्धशतककी (64) तर दुसऱ्या डावात शतकी (109) खेळी केली. सामना अनिर्णित सुटल्यानंतर रुटला दोन्ही डावातील चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बुमराहचा ‘पंच’

पहिल्या डावांक इंग्लंडला 183 धावांत सर्वबाद केल्यानंतर भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात मात्र पहिल्या डावाची पुनरावृत्ती करता आली नाही. पण अनुभवी आणि भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वात महत्त्वाच्या जो रुटच्या विकेटसह आणखी 4 इंग्लंडचे फलंदाज तंबूत धाडले. ज्यामुळे भारताला काही प्रमाणात कमी असे टार्गेट मिळाले होते. बुमराहने दुसऱ्या डावात एकूण पाच बळी मिळवले. पहिल्या डावातही त्याने 4 बळी घेतले होते.

इतर बातम्या

Happy Birthday Kane Williamson : 15 हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा, 37 शतकं, WTC चा चषक, न्यूझीलंडचा कर्णधार केनचा वाढदिवस

एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

(IND vs ENG, 1st Test : Play abandoned due to heavy rain, match ends in a draw)