मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत येत्या 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान (Ind v pak) मध्ये सामना रंगणार आहे. या मॅच मध्ये विराट कोहलीवरसगळ्यांच लक्ष असेल. या मॅच मध्ये विराट कोहली (Virat kohli) मैदानात उतरुन इतिहास रचणार आणि शतकही ठोकणार. रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येतील. विराट कोहली या सामन्यात इतिहास आणि शतक दोन्ही बनवताना दिसेल. तुम्ही हे वाचून थोडं चक्रावून जालं, हे कसं शक्य आहे? महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीला यासाठी चेंडू आणि बॅट हातात धरण्याची आवश्यकता नाही. विराट मैदानावर उतरताच एक नवीन इतिहास रचला जाईल.
विराट कोहलीच्या शतकाची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याने शतक झळकवून 1,000 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. पाकिस्तान विरुद्ध 28 ऑगस्टला होणाऱ्या सामन्यात, विराट धावांचं नाही, पण टी 20 सामन्यांच शतक मात्र नक्कीच झळकवणार आहे.
28 ऑगस्टला विराट कोहली मैदानावर उतरेल, त्यावेळी तिन्ही फॉर्मेट मध्ये 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनेल.
विराट कोहलीने वनडे मध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. 11 जून 2013 रोजी तो 100 वा वनडे सामना खेळला. इंग्लंड मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध तो हा सामना खेळला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये विराटने दुसरं शतक कसोटी क्रिकेट मध्ये झळकावलं. 4 मार्च 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध मोहाली मध्ये हा सामना झाला होता.
आता 5 महिन्यानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सामन्यांचं आणखी एक शतक पूर्ण करणार आहे. 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणारा सामना, त्याच्या टी 20 करीयरमधला 100 वा सामना आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी 20 सामन्यात 3308 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आणि स्ट्राइक रेट 137.66 चा आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर एकाही शतकाची नोंद नाहीय. त्याने 30 अर्धशतकं झळकावली आहेत.