IND vs SL : हार्दिक पांड्याने वनडे मालिकेतून घेतली माघार, बीसीसीआयला दिलं असं कारण

भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी संघ निवडीसाठी खलबतं सुरु आहे. असं असताना श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेतून हार्दिक पांड्याने नाव मागे घेतलं आहे. हार्दिक पांड्याने याबाबतची माहिती बीसीसीआयला दिली आहे.

IND vs SL : हार्दिक पांड्याने वनडे मालिकेतून घेतली माघार, बीसीसीआयला दिलं असं कारण
| Updated on: Jul 16, 2024 | 2:38 PM

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. सुरुवातीला तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. त्यामुळे या दोन्ही मालिकांसाठी संघाची निवड कशी होणार याची खलबतं सुरु आहे. असं असताना हार्दिक पांड्या वनडे मालिका खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. कारण त्याने बीसीसीआयला वैयक्तिक कारण सांगून या स्पर्धेतून माघार घेतली आहे. हार्दिक पांड्या वैयक्तिक कारणामुळे टी20 मालिका खेळून दौरा सोडणार असल्याने वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. वैयक्तिक कारण पत्नी नताशाशी निगडीत तर नसावं ना, असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. मागच्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा यांच्या नात्यात दूरावा आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. त्याला या दोघांच्या वागण्यामुले काही अंशी दुजोराही मिळत आहे. टी20 वर्ल्डकप असो की अनंत अंबानीचं लग्न, हार्दिक पांड्या एकटाच दिसला होता. त्यामुळे पुढच्या महिन्यात या दोघांच्या नात्याबाबत अपडेट मिळण्याची शक्यता असू शकते, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

दरम्यान, टी20 मालिकेची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधारपदी हार्दिक पांड्या होता. त्यामुळे रोहित शर्मानंतर हे पद हार्दिक पांड्याला मिळेल. कारण टी20 मालिका हार्दिक पांड्या खेळत असल्याने त्याच्याकडेच सूत्र सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्याच्या टी20 मालिकेत हार्दिक पांड्या सूत्र हाती घेईल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दरम्यान, या शर्यतीत सूर्यकुमार यादवचं नावंही चर्चेत आहे. तसेच आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहने टी20 संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे आता कोणाची कर्णधारपदी नियुक्ती होते याची उत्सुकता आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात कोणतीच उणीव भासू नये यासाठी सर्वच प्रयत्न केले जात आहे. इतकंच काय तर दिग्गज खेळाडूंना मिळाला आराम पुरेसा असून त्यांनी या मालिकेत खेळावं असा आग्रह गौतम गंभीरने धरल्याचं वृत्त आहे. त्यामुळे श्रीलंका मालिकेत कसा संघ असेल? इथपासून संघात कोण असेल याची चर्चा रंगली आहे. बीसीसीआय निवड समिती आज संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us