IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय
भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेचं महत्त्व माहिती असल्याने सर्वांचा नजरा खिळल्या आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. सराव सामन्यात भारताने बाजी मारली. पण असं असूनही टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघ पास झाला आहे. पण मालिकेत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने आराम करण्याऐवजी सराव सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. सराव सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कामाला लागली आहे. सरावादरम्यान टीम इंडियाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. मालिकेदरम्यान वर्कलोडकडे लक्ष ठेवून संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजांना आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांना आराम दिला गेला आहे. पण युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीला मात्र सराव करण्यास भाग पाडलं. सरावादरम्यान आकिब नबी हा एकमेव गोलंदाज गोलंदाजी करत होता.
आकिब नबीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण!
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी आकिब नबीची वर्णी लागली आहे. आता त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरीकडे, त्याला वॉर्मअप सामन्यात सर्वात कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पहिल्या डावात तर त्याने एकही चेंडू टाकला नाही. दुसऱ्या डावात त्याला संधी मिळाली, पण फक्त 5 षटकं टाकली. त्यात त्याला एकही विकेट मिळाला नाही. त्यामुळे त्याचा पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 साठी फार काही विचार केला जात नाही. पण एक बॅकअप प्लान म्हणून संघ व्यवस्थापन त्याच्याकडून नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करून घेत आहेत.
सरफराज खान कसोटीसाठी सज्ज
सरफराज खानला पुन्हा एकदा टीम इंडियात जागा मिळाली आहे. साई सुदर्शन जखमी असल्याने त्याच्या जागी सरफराजला संधी दिली आहे. सरफराज खान शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत दीड वर्षांच्या कालावधी लोटला आणि आता कुठे संधी मिळाली. या संधींचं सोनं करण्यासाठी सरावात घाम गाळत आहे. सरफराज खानला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता संधी मिळाल्यानंतर काय करतो याकडे लक्ष असेल. या मालिकेत जर फेल गेला तर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळणं खूप कठीण होईल.