IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धचा पराभव कर्णधार तिलक वर्माच्या जिव्हारी, कुणावर फोडलं खापर?

भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार तिलक वर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.

IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धचा पराभव कर्णधार तिलक वर्माच्या जिव्हारी, कुणावर फोडलं खापर?
IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धचा पराभव कर्णधार तिलक वर्माच्या जिव्हारी, कुणावर फोडलं खापर?
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2026 | 7:29 PM

ट्राय नेशन ए सिरीज स्पर्धेतील दुसरा सामन्यात अफगाणिस्तानने भारताला 4 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 9 गडी गमवून 349 धावा केल्या. तसेच विजयासाठी 350 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानने 25.5 षटकात 2 गडी गमवून 177 धावा केल्या. 26 व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे हा सामना थांबवावा लागला. या स्थितीत अफगाणिस्तानचा संघ भारतापेक्षा 3 धावांनी पुढे होता. त्यामुळे पाऊस थांबला नाही आणि सामन्यात थांबवण्याची वेळ आली, तर अफगाणिस्तान जिंकणार हे निश्चित झालं होतं. बराच काळ वाट पाहिल्यानंतर पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानने भारताला 4 धावांनी मात दिली. त्यामुळे 349 धावा करून ही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवानंतर कर्णधार तिलक वर्माने आपलं मत व्यक्त केलं. सामन्यानंतर त्याने नेमकं काय चुकलं ते सांगितलं.

भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर आम्ही चांगली फलंदाजी केली आणि या खेळपट्टीवर 349 ही एक सरासरी धावसंख्या होती. पण दुर्दैवाने, डकवर्थ-लुईस-स्टाईल नियमामुळे सामना 39 षटकांपर्यंत कमी झाला, तरीही आम्ही सामन्यात टिकून होतो. दुर्दैवाने पाऊस आला.’ तिलक वर्माला खेळपट्टी बाबत पुढे विचारलं गेलं. खेळपट्टी फलंदाजांसाठी इतकी चांगली होती का की गोलंदाजांना यशच मिळत नव्हते? तेव्हा तिलक वर्मा म्हणाला की, आम्ही काही बदल केले, पण ते क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याबाहेरचे होते. अफगाणिस्तान चांगला खेळला, पण त्याच वेळी आम्हाला वाटत होते की सामना ३९ षटकांपर्यंत जाईल. जर सामना ३९ षटकांपर्यंत गेला असता, तर चित्र वेगळे असू शकले असते.

टीम इंडियाची गोलंदाजी ही चिंतेची बाब आहे का? त्यावर तिलक वर्मा म्हणाला की, ‘मी असे म्हणणार नाही की ही चिंतेची बाब आहे, पण आम्ही पुन्हा नव्याने विचार करून पुढच्या सामन्यात अधिक मजबूत होऊन परत येऊ. पुढचे दोन सामने जिंकून अंतिम सामना खेळणे हे आमचे ध्येय आहे.’ टीम इंडियाच्या या पराभवामुळे गुणतालिकेत नुकसान झालं आहे. अफगाणिस्तानचा संघ 2 गुण आणइ +0.155 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर भारताने एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवासह 2 गुण आणि +0.053 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका एका सामना खेळली आणि पराभूत झाल्याने एकही गुण नाही.

Follow Us