
लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोण जिंकणार? भारत की, ऑस्ट्रेलिया? या प्रश्नाच उत्तर सध्या मिळणं कठीण आहे. दोन्ही तुल्यबळ टीम आहेत. दोन्ही टीम्समध्ये कमालीचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. यात कोण सरस ठरणार? हे सांगण थोडं कठीण आहे. या मुद्यावर हरभजन सिंग आणि मॅथ्यू हेडन आमने-सामने आले. टीम इंडियाच टेस्ट चॅम्पियन का बनणार? त्याची हरभजन सिंगने तीन कारणं सांगितली. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया कसा किताब जिंकणार ते मॅथ्यू हेडनने सांगितलं.
स्टार स्पोर्ट्सने हरभजन सिंग आणि मॅथ्यू हेडनचा व्हिडिओ शेयर केलाय. दोन्ही खेळाडू आपआपल्या टीमची ताकत आणि वैशिष्टय सांगत आहेत.
पहिलं कारण
अलीकडेच भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलय. मायदेशातच नाही, तर ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवलय. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. शुभमन गिल आणि विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाने 350 ते 400 धावा केल्यात तर त्यांच्याकडे चांगली संधी असेल.
दुसरं कारण
हरभजनने सांगितलं की, ओव्हलच्या पीचवर स्पिनर्सना बाऊन्स मिळतो. टीम इंडियाचे स्पिनर्स ओव्हलवर चालतील. उष्णतेमुळे तिथे स्पिनर्सला टर्न सुद्धा मिळेल, असं हरभजनने म्हटलय.
तिसरं कारण
भारताचे सीमर्स फॉर्ममध्ये आहेत. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी कमालीची गोलंदाजी करतायत. दोघांनी आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केलय. फॉर्म त्यांच्यासोबत आहे. उमेश यादव सुद्धा इंग्लंडच्या खेळपट्टीचा फायदा उचलू शकतो.
ऑस्ट्रेलिया जिंकेल असं मॅथ्यू हेडन का म्हणतो?
मॅथ्यू हेडनने सांगितलं की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमने इंग्लिश भूमीवर नेहमीच चांगली कामगिरी केलीय. एलेन बॉर्डर यांच्या काळापासून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये प्रत्येक परिस्थितीत सामने जिंकले आहेत. हेडनने दुसर कारण सांगितलं की, ऑस्ट्रेलियन खेळाडू मानसिक दृष्टया थकलेले नाहीत. त्यांना बराच आराम मिळालाय. भारतीय खेळाडू सलग दोन महिने आयपीएल खेळून इंग्लंडमध्ये दाखल झालेत. नाथन लायन टीम इंडियाला भारी पडेल, असं मॅथ्यू हेडनला वाटतं.