IND vs BAN T20 WC: केएल राहुल, विराट कोहली लढले, बांग्लादेशला विजयासाठी मोठं लक्ष्य

IND vs BAN T20 WC: विराट कोहलीच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला बांग्लादेशसमोर चांगलं लक्ष्य उभारता आलं.

IND vs BAN T20 WC: केएल राहुल, विराट कोहली लढले, बांग्लादेशला विजयासाठी मोठं लक्ष्य
virat kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 02, 2022 | 3:18 PM

अॅडिलेड: टीम इंडियाचा आज बांग्लादेश विरुद्ध एडिलेड ओव्हलच्या मैदानात सामना सुरु आहे. सेमीफायनल प्रवेशासाठी टीम इंडियाला ही मॅच जिंकण आवश्यक आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव चमकले. अन्य फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. टीमला गरज असताना हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाले.

विराटची जबरदस्त फलंदाजी

वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहे. अपवाद फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याचा. आज पुन्हा एकदा विराट कोहलीने हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने बांग्लादेश विरुद्ध 37 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकावली. विराटने 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 1 षटकार आहे.

रोहित स्वस्तात बाद

बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची आज चांगली सुरुवात झाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. रोहितने 8 चेंडूत फक्त 2 धावा केल्या. हसन महमूदने त्याला यासीर अलीकरवी कॅच आऊट केलं.

केएल राहुलने फोडून काढलं

त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने मिळून डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. राहुलने आज मागच्या तीन सामन्यातला अपयश धुवून काढलं. त्याने बांग्लादेशची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 31 चेंडूत हाफसेंच्युरी झळकवली. यात 3 चौकार आणि 4 षटकार होते. हाफसेंच्युरी नंतर तो लगेच आऊट झाला. शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर त्याने मुस्तफीझूर रहमानकडे सोपा झेल दिला.

सूर्यकुमार चालला, पण…

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या नेहमीच्या आक्रमक स्टाइलमध्ये फटकेबाजी केली. सूर्याने 16 चेंडूत 30 धावा केल्या. यात 4 चौकार होते. शाकीब अल हसनने त्याला बोल्ड केलं. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्या फार चमक दाखवू शकला नाही. 6 चेंडूत 5 धावा करुन तो स्वस्तात बाद झाला. दिनेश कार्तिक 7 रन्सवर रनआऊट झाला.

आज विजय हवाच

सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पुढे प्रवास सुरु ठेवण्यासाठी टीम इंडियाला आजची मॅच जिंकावीच लागेल. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज आहे.