IND vs PAK: टीम इंडियासाठी पाकिस्तानचं आव्हान सोपं नसेल, ‘हे’ आहेत पाच धोके

| Updated on: Sep 04, 2022 | 8:14 AM

IND vs PAK: भारत-पाकिस्तानच्या (IND vs PAK) टीम्स आज पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आशिया कप 2022 (Asia cup) मध्ये सुपर 4 फेरीचे सामने शनिवारपासून सुरु झालेत.

IND vs PAK: टीम इंडियासाठी पाकिस्तानचं आव्हान सोपं नसेल, हे आहेत पाच धोके
ind vs pak
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारत-पाकिस्तानच्या (IND vs PAK) टीम्स आज पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आशिया कप 2022 (Asia cup) मध्ये सुपर 4 फेरीचे सामने शनिवारपासून सुरु झाले. रविवारी भारताचा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. याआधी मागच्या रविवारी दोन्ही टीम्स मध्ये सामना झाला. त्यावेळी भारताने (Team India) पाच विकेट राखून विजय मिळवला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. पाकिस्तानने पहिला सामना गमावल्यामुळे दुसऱ्या मॅच मध्ये त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ची स्थिती होती.

फक्त 38 रन्सवर ऑलआऊट

हाँगकाँग विरुद्ध सामना हरला असता, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला असता. पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. हाँगकाँगच्या टीमला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. शानदार विजयासह सुपर 4 फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. दोन विकेट गमावून 193 धावा केल्या. हाँगकाँगची संपूर्ण टीम फक्त 38 रन्सवर ऑलआऊट झाली. या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारतासाठी हे धोक्याचं ठरु शकतं.

आज पाकिस्तानच आव्हान टीम इंडियासाठी सोपं नसेल. भारताच्या मार्गात काय अडथळे आहेत? ते समजून घेऊया.

  1. मोहम्मद रिजवानने हाँगकाँग विरुद्ध दमदार खेळ दाखवला. त्याने 57 चेंडूत नाबाद 78 धावा फटकावल्या. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. रिजवानने मागच्यावर्षी सुद्धा टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारताविरुद्ध दमदार खेळ दाखवला होता. आशिया कप स्पर्धेत त्याला सूर सापडला आहे. भारतासाठी त्याचा फॉर्म डोकेदुखी ठरु शकतो.
  2. कॅप्टन बाबर आजम आतापर्यंत या स्पर्धेत दोन सामन्यात अपयशी ठरला आहे. तो पुनरागमनासाठी आतुर आहे. भारताविरोधात बाबर दमदार खेळ दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
  3. फखर जमां आणि खुशदिल शाह यांनी सुद्धा हाँगकाँग विरुद्ध अर्धशतक झळकावली होती. या इनिंग मधून त्यांना आत्मविश्वास मिळाला आहे. जो भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतो.
  4. शादाब खानची फिरकी गोलंदाजी भारतासाठी अडचणीची ठरु शकते. भारताचे काही फलंदाज स्पिनर्सना सहजतेने खेळत नाहीत. लेग स्पिन गोलंदाजी खेळताना अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा अपयशी ठरलेत.
  5. नसीम शाहने पहिल्या सामन्यात भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. केएल राहुल, सूर्यकुमार यादवची विकेट त्याने काढली होती. कोहलीला सुद्धा स्लीप मध्ये कॅच सुटल्याने जीवदान मिळालं होतं. नसीम शाह तंदुरुस्त वाटत नव्हता. पण आता तो फिट झाला आहे. भारताच्या वरच्या फळीला त्याची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढावी लागेल.