
भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला तर भारताचा दक्षिण आफ्रिकेतील हा पहिला कसोटी मालिकाविजय असेल. टीम इंडियाच्या कामगिरीसोबतच भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडेदेखील असतील. कारण नवीन वर्षात त्याचा फॉर्मही परतेल अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे कर्णधार म्हणून कोहलीची आकडेवारी आणखी सुधारली आहे. मात्र, वैयक्तिकरित्या त्याला यश मिळाले नाही आणि सलग दुसरे वर्ष शतकाशिवाय संपले (विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक फटकावलं होतं). आता नवीन वर्षात कोहली हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.

कोहलीला मोठ्या खेळीची गरज आहे आणि त्यासाठी तो नेटमध्ये खूप मेहनत घेतोय. कसोटीच्या एक दिवस आधी, कोहलीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आणि सांगितले की, त्याच्यासाठी फक्त वर्ष बदलले आहे, परंतु त्याची प्रेरणा बदललेली नाही.

टीम इंडियासोबतच विराट कोहलीच्या चाहत्यांनाही नवीन वर्षात कर्णधाराकडून मोठ्या आशा आहेत. नोव्हेंबर 2019 पासून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने काही अर्धशतके झळकावली आहेत, पण तो त्याचे शतकात रूपांतर करू शकला नाही. अशा स्थितीत जोहान्सबर्ग कसोटीसह त्याचा फॉर्मही बदलण्याची अपेक्षा आहे.