IND vs SA Final : स्मृती, हरमनप्रीतचा फ्लॉप शो, फायनलमध्ये दिसली जुनी कमजोरी

| Updated on: Feb 03, 2023 | 9:35 AM

IND vs SA Final : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने टॉस जिंकून पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाला याचा फायदा उचलता आला नाही. भारताचा बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली. ईस्ट लंडनच्या बफेलो पार्कमध्ये फायनल सामना झाला.

IND vs SA Final : स्मृती, हरमनप्रीतचा फ्लॉप शो, फायनलमध्ये दिसली जुनी कमजोरी
Team india
Image Credit source: Getty Images
Follow us on

Team India : चार दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाच्या अंडर-19 महिला क्रिकेट टीमने इतिहास रचला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या अंडर-19 महिला टी 20 वर्ल्ड कपच विजेतेपद पटकावलं. आता सीनियर महिला क्रिकेट टीम 10 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. या वर्ल्ड कपआधी तयारीसाठी म्हणून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत टी 20 सीरीज खेळली. या सीरीजच्या फायनलमध्ये तेच दृश्य पहायला मिळालं, जे इतर फायनलमध्ये दिसतं. खराब बॅटिंमुळे महिला टीम इंडियाचा पराभव.

टीम इंडियाने चांगलं प्रदर्शन केलं, पण….

यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तिरंगी टी 20 मालिका झाली. दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारीपासून टी 20 वर्ल्ड कप सुरु होतोय. त्याआधी ही एक चांगली संधी होती. सीनियर महिला टीम इंडियाने या टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. पण गुरुवारी 2 फेब्रुवारीला झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

टीम इंडियाची बॅटिंग फ्लॉप

ईस्ट लंडनच्या बफेलो पार्कमध्ये फायनल सामना झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने टॉस जिंकून पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाला याचा फायदा उचलता आला नाही. भारताचा बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली. स्मृती मांधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर काही खास करु शकल्या नाहीत.

टीमसाठी फक्त हरलीन देओलने संघर्ष केला. तिने 56 चेंडूत 46 धावा केल्या. 20 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 4 विकेट गमावून फक्त 109 धावा केल्या.

स्पिनर्सची चांगली सुरुवात

इतक्या छोट्या धावसंख्येचा बचाव करताना टीम इंडियाला गोलंदाजीत चमत्कार दाखवणं आवश्यक होतं. सुरुवात तशी झाली होती. स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणाच्या स्पिन तिकडीने सातव्या ओव्हरपर्यंत 21 धावात दक्षिण आफ्रिकेच्या टॉप 3 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर रेणुका सिंहने कॅप्टन सुने लूसला आऊट केलं. 13.1 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची 6 बाद 66 धावा अशी स्थिती होती.

एका बॅट्समनने हिरावला विजय

गोलंदाजांनी टीम इंडियासाठी मॅच फिरवलीय असं वाटत होतं. पण स्फोटक बॅट्समन क्लोई ट्रियॉनने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पाचव्या नंबरवर बॅटिंगसाठी आलेल्या ट्रियॉनने फक्त 32 चेंडूत 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 57 धावा कुटल्या. 18 व्या ओव्हरमध्ये तिने 5 विकेट राखून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.