IND vs WI: ऋषभ पंतला ओपनिंगला का आणलं? दुसरी संधी मिळेल का? रोहित शर्माने दिलं उत्तर

| Updated on: Feb 10, 2022 | 7:21 AM

या वनडे सीरीजच्या निमित्ताने भारतीय संघ वेगवेगळे प्रयोग करत आहे. काल दुसऱ्या वनडेत केलेल्या एका प्रयोगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

IND vs WI: ऋषभ पंतला ओपनिंगला का आणलं? दुसरी संधी मिळेल का? रोहित शर्माने दिलं उत्तर
Follow us on

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या (India vs West indies) वनडे मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली बुधवारी भारताने सलग दुसरा वनडे सामना जिंकला. आता उद्या होणारा तिसरा वनडे सामना केवळ औपचारीकता असेल. या वनडे सीरीजच्या निमित्ताने भारतीय संघ वेगवेगळे प्रयोग करत आहे. काल दुसऱ्या वनडेत केलेल्या एका प्रयोगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) रोहितसोबत सलामीला आला होता. खरंतर ऋषभ मागच्या काही सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. कालच्या सामन्यात उपकर्णधार केएल राहुलचा संघात समावेश झाल्यामुळे इशान किशनला बाहेर बसवलं. राहुलला ओपनिंग ऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. ऋषभ पंतला सलामीला आणण्याचा प्रयोग यशस्वी ठरला नाही. पण राहुल चौथ्या क्रमांकावर यशस्वी ठरला. त्याने 48 चेंडूत 49 धावा केल्या.

शिखर धवन तिसऱ्या सामन्यात खेळणार
ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्यामागचं कारण रोहितने सांगितलं. भविष्यात पुन्हा ऋषभ सलामीवीर म्हणून दिसेल का? या प्रश्नाचं उत्तरही रोहितने दिलं. सलामीवर शिखर धवनला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो पहिल्या दोन वनडेमध्ये खेळू शकला नाही. पहिल्या सामन्यात इशान किशन सलामीला आला होता. पण तो प्रभावित करु शकला नाही. कालच्या सामन्यात केएल राहुल सलामीला येईल, असा अंदाज सर्वांनी बांधला होता. पण राहुल ऐवजी पंतला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मला प्रत्येकजण सांगत होता की…
वनडेत पहिल्यांदा ओपनिंग करणाऱ्या ऋषभ पंतने 34 चेंडूत फक्त 18 धावा केल्या. यामुळे टीमला फार फरक पडला नाही. पण कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं की, ऋषभ पंत हा काही स्थायी पर्याय नाहीय. “मला प्रत्येकजण सांगत होता की, काहीतरी वेगळ करं, हा निर्णय वेगळाच तर होता. ऋषभला ओपनिंला पाहून काही लोक आनंदी झाले असतील. पण हा स्थायी पर्याय नाही. पुढच्या सामन्यात शिखर धवन पुनरागमन करणार आहे” असं रोहितने सांगितलं. दीर्घकालीन उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेवून असे प्रयोग सुरु ठेवणार असल्याचं रोहितने स्पष्ट केलं. यामुळे कोणी एक-दोन सामन्यात बाहेर जाणार असेल, तरी प्रक्रियेमध्ये फरक पडणार नाही.

India vs west indies 2nd odi rohit sharma explains why rishabh pant brings to opening