Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

| Updated on: Sep 06, 2021 | 3:26 PM

सध्याच्या भारतीय कसोटी संघातील विश्वासू फलंदाज असणाऱ्या रहाणेची बॅट इंग्लंड दौऱ्यात धावा करण्यात सतत अपयशी होत आहे. लॉर्ड्स कसोटीतील अर्धशतकाशिवाय (61) रहाणेला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आलेला नाही.

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?
अजिंक्य रहाणे
Follow us on

मुंबई : कोणत्याही क्रिकेटपटूची कारकीर्द ही एखाद्या खडकाळ रस्त्याप्रमाणेच असते. कधी चढ तर कधी उतार… प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी एकतरी वेळ येतेच जेव्हा तो सतत खराब प्रदर्शन करत आपल्या कारकीर्दचा आलेख उतरता करुन घेतो. अगदी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सारखा महान फलंदाज ही या सर्वांपासून चूकला नाही. सचिनच काय जगातील प्रत्येक फलंदाजाच्या आयुष्यात अशी वेळ आलीच होती. ही वेळ आली की त्याचेच चाहते, देशवासिय त्याला संघातून बाहेर पडून विश्रांती घेण्याचा सल्ला देऊ लागतात… त्यात अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे तर अशा प्रकारच्या टीका आणि सल्ले देण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. अशीच काहीशी परिस्थिती सध्या भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा (Indian Cricket team) कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यावर ओढावली आहे.

सध्याच्या भारतीय कसोटी संघातील विश्वासू फलंदाज असणाऱ्या रहाणेची बॅट इंग्लंड दौऱ्यात धावा करण्यात सतत अपयशी होत आहे. लॉर्ड्स कसोटीतील अर्धशतकाशिवाय (61) रहाणेला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. त्यात चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र रहाणेवर टीकांची एकच झुंबड उडाली. इतर सर्व खेळाडूंच्या खेळाला बाजूला ठेवत सर्व भारतीय चाहत्यांनी रहाणेला मात्र संघातून हटवा अशी मागणी करत सोशल मीडियावर रहाणेला कमालीचं ट्रोल केलं. पण मूळात या एका दौऱ्यातील खराब प्रदर्शनानंतर रहाणेने खरचं कसोटी क्रिकेटमधून विश्रांची घ्यायला हवी का? हाच त्याच्या कारकीर्दचा शेवट असेल का? अशा एक न अनेक प्रश्नांनी सध्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात वादळ उठवलं आहे.

रहाणेचा बॅड पॅच!

खेळ म्हटलंकी त्यात विजय आणि पराभव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आल्याच. त्याच खेळातील खेळाडूही कधी चांगला तर कधी वाईट खेळ खेळणारच. त्यामुळे प्रत्येक खेळाडू हा आयुष्यातील एका वेळी खराब प्रदर्शन करतच असतो. ज्यामुळे त्याची कारकीर्द संपते की काय? असे प्रश्न अनेकांना पडतात. पण याच काळाला बॅड पॅच अर्थात आयुष्यातील वाईट काळ म्हटलं जातं. पण हा एक काळ असल्याने व्याकरण आणि आयुष्याच्या नियमांप्रमाणे तो बदलतोच! त्यामुळे रहाणेने मेहनत आणि सरावाने हा काळ बदलणं गरजेचं आहे.

ऑस्ट्रेलियातील ‘अजिंक्य’ मालिका आणि रहाणे

कसोटी क्रिकेट म्हटलंकी प्रत्येक भारतीय बॉर्डर-गावस्कर चषक कधीच विसरु शकणार नाही. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या चित्तथरारक विजयात अजिंक्य रहाणेने एक विश्वासू फलंदाजच नाही तर कर्णधार म्हणूनही मोलाची भूमिका पार पाडली होती. विशेष म्हणजे रहाणेने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या आणि युवा खेळाडूंना सोबत घेत शानदार विजय मिळवला. पहिल्या कसोटीत अवघ्या 36 धावावंर सर्वबाद झालेल्या भारतीय संघावर जगभरातून टीका होत होती. पण या सर्वांपासून अजिबात न डगमगता रहाणेने दुसऱ्या कसोटीत शानदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. मग तिसरी कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर चौथ्या आणि निर्णायक कसोटीत संघाचं नेतृत्त्व करत भारताला सामना आणि मालिका जिंकवून दिली. त्यामुळे अशी निर्णायक मालिका जिंकवून देत इतिहास लिहिणाऱ्या रहाणेला इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरी नंतर संघाबाहेर जाण्यास सांगणाऱ्या प्रत्येकानं ही मालिका आठवणं कुठेतरी गरजेचं आहे.

इंग्लंडच्या मालिकेत आतापर्यंत रहाणे

इंग्लंड मालिकेत सुरुवातीपासूनच अजिंक्यला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता येत नसून तो संपूर्ण मालिकेत केवळ 109 धावा करु शकला आहे. यामध्ये लॉर्ड्सच्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात मधली फळी सांभाळत 61 धावा केल्या होत्या. याशिवाय मालिकेत त्याला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. अजिंक्यने पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा केल्या. त्या सामन्यात भारताला पावसामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करता आली नाही. ज्यानंतर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात एक धाव करुन बाद झालेल्या अजिंक्यने दुसऱ्या डावांत मात्र 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

दुसऱ्या कसोटीनंतर रहाणे पुन्हा पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 18 आणि दुसऱ्या डावात 10 धावा करत त्याने पुन्हा सर्वांची निराशा केली. त्यानंतर चौथ्या कसोटीत पहिल्या डावात केवळ 14 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात रहाणेला साधे खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे आता पाचव्या कसोटीत त्याला संधी मिळणार का? आणि मिळाल्यास तो संधीचे सोने करणार का? तसंच या दौऱ्यानंतर पुढील दौऱ्यात रहाणे संघात असणार का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर रहाणेची बॅटच देईल…