रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची स्थिती 17व्या पर्वातही काही खास राहिली नाही. सुरुवातीच्या सामन्यात सलग पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे. तर सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुणतालिके आरसीबीचा संघ 2 गुणांसह सर्वात तळाशी आहे. त्यामुळे प्लेऑफचा रस्ता जवळपास बंद झाला आहे. मात्र गणिती भाषेत पाहिलं तर आरसीबीच्या आशा अजूनही जिवंत आहेत. प्लेऑफमध्ये म्हणजेच टॉप 4 संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. आरसीबीला फक्त आता टॉप 3 संघांसाठी देवाकडे प्रार्थना करावी लागणार आहे. सध्या टॉप 3 मध्ये असलेल्या संघांनी यापुढचे सर्व सामने जिंकायला हवेत. यामुळे इतर संघांची प्लेऑफमध्ये जाण्याची गोची होईल. तसेच आरसीबीला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. म्हणजेच सध्या राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने पुढचे सामने जिंकले तर प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल.
राजस्थान रॉयल्सचे एकूण सहा सामने शिल्लक आहेत. सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवला तर 22 गुण होतील. कोलकाता आणि हैदराबाद उर्वरित सात पैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे प्रत्येकी 20 गुण होतील. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थान पक्कं होऊन जाईल. पण चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. आरसीबीने उर्वरित 6 सामने जिंकले तर 14 गुण होतील. तर इतर संघांचं गणित पाहता त्यांच्याकडे फक्त 12 गुण जमा होतील. त्यामुळे असं गणित जुळून आलं तर आरसीबी प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल.
आयपीएलच्या 41व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव झाला तर मात्र प्लेऑफमधून संघ बाहेर फेकला जाईल. पण जिंकला तर मात्र प्लेऑफची चुरस आणखी रंगतदार होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पुढील सामने पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्ससोबत आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध दोनदा लढत होणार आहे.