IPL 2026: मुंबई इंडियन्सचा शेवटही पराभवाने, कर्णधार हार्दिक पांड्याने कारणमीमांसा करत सांगितलं की…
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जात होता. कागदी आकडेवारीवरून तसंच वाटत होतं. पण प्रत्यक्षात कामगिरी ढिसाळ राहिली. त्यामुळे साखळी फेरीच्या 11व्या सामन्यातच आव्हान संपुष्टात आलं. असं असताना या स्पर्धेचा शेवटही कटू झाला.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 69वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. पण हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 205 धावा केल्या. तसेच विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही मुंबई इंडियन्सला गाठता आलं नाही. मुंबई इंडियन्स संघ 20 षटकात 9 गडी गमवून 175 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना मुंबई इंडियन्स 30 धावांनी गमावला. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून प्लेऑफमधील चौथं स्थान पक्कं केलं आहे. राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सशी लढत करणार आहे. दुसरीकडे, या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हताश दिसला. त्याने सामन्यानंतर आपलं मत व्यक्त केलं.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘मला वाटतं आम्ही गोलंदाजीने 10-15 धावा जास्त दिल्या. खेळपट्टीवर बरीच उष्णता होती, गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलं. धावसंख्या गाठण्यासारखी होती, पण पॉवरप्लेमध्ये आमच्या खूप विकेट्स गेल्या आणि मग सामना पिछाडीवर गेला. जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा खेळपट्टी चांगली उसळत आहे असं वाटलं. दोन्ही डावांमध्ये खेळपट्टी सारखीच होती. चेंडू बॅटवर येत होता. फक्त आपली लय टिकवून ठेवायची होती आणि चांगले क्रिकेटिंग फटके खेळायचे होते. डेथ ओव्हर्स नेहमीच कठीण असतात आणि माझा नेहमी विश्वास असतो की, जर तुम्ही त्या 5 षटकांच्या काळात एक दोन चौकार रोखू शकलात, तर तुम्ही नेहमीच 12-15 धावांनी कमी पडता. दुर्दैवाने आम्ही ते करू शकलो नाही. शेवटच्या 5 षटकांत 73 धावा झाल्यामुळे आम्हाला सामना गमवावा लागला.’
मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा होता. त्यामुळे या स्पर्धेत जेतेपद पटकावेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. मुंबई इंडियन्सने 14 पैकी 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. तर फक्त चार सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे 8 गुण पदरात पडले. त्यातल्या त्यात लखनौ सुपर जायंट्सपेक्षा चांगला नेट रनरेट असल्याने नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाची अशी स्थिती पाहून क्रीडाप्रेमींनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.