Cricket : ईशान कर्णधार, विराट उपकर्णधार, 16 सदस्यीय टीम जाहीर, पहिला सामना 15 ऑक्टोबरला
Ishan Kishan Cricket : आगामी रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेसाठी शनिवारी 27 सप्टेंबरला झारखंड क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत ईशान किशन झारखंडचं नेतृत्व करणार आहे.

टीम इंडिया रविवारी 28 सप्टेंबरला टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात 15 ऑक्टोबरपासून प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी झारखंडने संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ईशान किशन याला रणजी ट्रॉफीसाठी झारखंड क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत विराट ईशानच्या नेतृत्वात खेळणार आहे. हा विराट कोहली नसून विराट सिंह आहे. विराटला झारखंडचा उपकर्णधार करण्यात आलं आहे.
झारखंडने जाहीर केलेल्या 16 सदस्यीय संघात ईशान किशन आणि विराट सिंह या दोघांव्यतिरिक्त आणखी कुणाला संधी मिळालीय हे जाणून घेऊयात. निवड समितीने ऑलराउंडर अनूकल रॉय याचा समावेश केला आहे. विकेटकीपर म्हणून कुमार कुशाग्र याला संधी दिलीय. झारखंड रणजी ट्रॉफी स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 15 ऑक्टोबरपासून करणार आहे. झारखंडसमोर या सामन्यात तामिळनाडूचं आव्हान असणार आहे.
ईशान रणजी ट्रॉफी स्पर्धेनिमित्ताने जवळपास साडे 3 महिन्यांनंतर ऑन फिल्ड परतणार आहे. ईशान त्याआधी आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात खेळत होता. ईशान त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर गेला. ईशानने इंग्लंड दौऱ्यात नॉटिंघमशरचं 2 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं.
ईशान किशनचं मिशन टीम इंडिया कमबॅक
दरम्यान आता ईशान किशन याला रणजी ट्रॉफीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे ईशानकडे या स्पर्धेत खोऱ्याने धावा करुन निवड समितीला भारतीय संघात स्थान देण्यास भाग पाडण्याची संधी आहे. मात्र ईशानला त्यासाठी सातत्याने धावा कराव्या लागणार आहेत. ईशान जवळपास गेल्या 2 वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे.
रणजी ट्रॉफीसाठी झारखंड क्रिकेट टीम : ईशान किशन (कर्णधार), विराट सिंह (उपकर्णधार), शरनदीप सिंह, शिखर मोहन, कुमार कुशाग्र, कुमार सूरज, अनुकूल रॉय, मनीषी, विकास कुमार, जतिन कुमार पांडे, विकास सिंह, आदित्य सिंह, साहिल राज, शुभम सिंह, आर्यमान सिंह आणि ऋशव राज.
