IND vs SL Test: श्रीलंकेत भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडणार! कपिल देव काय म्हणून गेले
भारताने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. असं असूनही माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे. मात्र या कसोटी मालिकेत भारतीय संघ जिंकणार का? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी री ओढत भारतीय फलंदाजीवर बोट ठेवलं आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कस लागणार असंच दिसत आहे. कपिल देव यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीचा अंदाज घेऊन हे भाष्य केलं आहे. कपिल देव यांच्या मते, भारतीय फलंदाज फिरकीविरुद्ध काही कामगिरी करत नाहीत. त्याचं कारण म्हणजे सर्वाधिक टी20 आणि वनडे सामने खेळणं. कपिल देव यांनी व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटमधील फरकावरच बोट ठेवलं आहे. त्याचं हे मत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आल्याने त्याचं वजन वाढलं आहे.
कपिल देव काय म्हणाले?
टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितलं की, ‘भारतीय संघाने फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगली कामगिरी न करण्याचे कारण म्हणजे ते खूप वनडे आणि टी20 क्रिकेट खेळतात. कसोटी क्रिकेट हा एक वेगळा खेळ आहे. आशा आहे की, ते श्रीलंकेत अधिक चांगला क्रिकेट खेळतील.’ इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटही खेळले पाहिजे, असं सांगत कानही टोचले. कपिल देव म्हणाले की, देशांतर्गत क्रिकेट खूप महत्त्वाचे आहे. यामुळेच भारतीय संघाला फिरकी गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागतो. ते जास्त देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत.
कपिल देव यांचं म्हणणं काही चुकीचं नाही. त्याची अनुभूती टीम इंडियाला न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आली आहे. मायदेशात झालेल्या या दोन्ही कसोटी मालिकेत भारताला क्लिन स्वीप मिळाला. त्यातही फिरकीचा सामना करताना भारतीय फलंदाज अडखळले. त्यामुळे श्रीलंकेतील आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. श्रीलंकन संघ फिरकीच्या जोरावर या मालिकेत कमाल करू शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा कसा लागणार आहे. आता भारतीय संघ फिरकीचा कसा सामना करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.