
टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करायचे आहेत. हा सामना 1 मार्चला होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागून आहे. अशात आता देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याच्या जम्मू काश्मीर या टीमने इतिहास घडवला आहे. जम्मू काश्मीर टीम रणजी चॅम्पियन ठरली आहे. मात्र हा रोहित शर्मा टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार नाही. हा रोहित जम्मूचा गोलंदाज आहे. रोहित रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्य संघात होता.
या सामन्याचं आयोजन हे हुबळीतील केएससीए अर्थात कर्नाटक क्रिकेट स्टेट असोशिएशनच्या क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीर विरुद्ध कर्नाटक महाअंतिम सामन्यात आमनेसामने होते. उभयसंघातील सामना पाचव्या दिवशी (28 फेब्रुवारी) अनिर्णित राहिला. सामना अनिर्णित राहिल्यानंतरही जम्मू चॅम्पियन कशी ठरली असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचं झालं असं की जम्मूने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. ही आघाडी निर्णायक ठरली. सामना बरोबरी सुटल्यानंतर या आघाडीच्या निकषाच्या आधारावर जम्मू-काश्मीरला चॅम्पियन जाहीर करण्यात आलं.
जम्मू काश्मीर क्रिकेट टीम रणजी ट्रॉफी स्पर्धेत 1959-60 पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हापासून ज्म्मूची पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा कायम होती. अखेर पारस डोगरा याच्या नेतृत्वात जम्मूने काश्मीर टीमने ही कामगिरी करुन दाखवली आहे. या विजयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 584 धावांचा डोंगर उभा केला. कर्नाटकला प्रत्त्युत्तरात 293 धावाच करता आल्या. त्यामुळे जम्मू-काश्मीरला 291 धावांची मोठी आघाडी मिळाली. जम्मू काश्मीरने दुसऱ्या डावात 113 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमानून 342 धावांपर्यंत मजल मारली. जम्मू काश्मीरने 630 धावांची आघाडी मिळवली. जम्मू काश्मीरने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. त्यामुळे सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नियमानुसार, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आलं.