लखनौच्या मालकावर केएल राहुलचा अजूनही राग? आयपीएल मेगा लिलावापूर्वी सांगितलं असं काही..
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडी घडणार आहे. मेगा लिलाव होणार असणार असल्याने संघ बांधणीसाठी आतापासूनच खलबतं सुरु झाली आहेत. लिलावात संघ मजबूत करण्यावर मालकांचा जोर असणार आहे. असं असताना विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलने मोठं विधान केलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेची तयारी सुरु झाली असून मेगा लिलावासाठी संघ मालक सज्ज आहेत. बीसीसीआयकडे सूचना सोपवल्या असून त्यावर एकदा अंतिम मोहोर लागली की संघ मालक पुढच्या रणनितीसाठी सज्ज होतील. नियम जाहीर झाले की कोणाला रिटेन करायचं आणि कोणाला सोडायचं हे ठरवता येणार आहे. असं असताना टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुलने आयपीएल मालकांबाबत एक विधान केलं आहे. त्याच्या विधानामुळे क्रीडारसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मागच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्सची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर होती. या संघाचा मालकी हक्क संजीव गोयंका यांच्याकडे आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत हैदराबादकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर संघ मालक गोयंका यांनी भर मैदानात राग व्यक्त केला होता. त्यामुळे त्याची खूपच चर्चा रंगली होती.
आयपीएल लिलावात आतापर्यंत खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावलेली दिसून आली आहे. मिचेल स्टार्क हा आयपीएलमधला आतापर्यंतचा महागडा खेळाडू ठरला आहे. तर काही अनकॅप्ड खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केएल राहुलने निखिल कामथच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. तेव्हा केएल राहुलने एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, ‘आयपीएलमध्ये बिझनेस बॅकग्राउंड असलेले मालक रिसर्च करतात आणि संघ निवडतात. पण तुम्ही निवडलेला संघ प्रत्येक सामना जिंकेल असं होऊ शकत नाही. आकडेवारीच्या आधारावर तुम्हाला चांगले खेळाडू मिळू शकतात. पण त्यांच्यासाठी हे वर्ष खराब असू शकतं. खेळात प्रत्येक खेळाडूचा एक वाईट दिवस असतो.’
केएल राहुलचं हे विधान क्रीडारसिक संजीव गोयंका यांच्याशी झालेल्या वादासोबत जुळवत आहेत. कारण हैदराबादने 10 विकेट्सने पराभूत केल्यानंतर संजीव गोयंका यांना राग अनावर झाला होता. तावातावाने टीम डगआऊटजवळच कर्णधार केएल राहुलशी बोलताना दिसले होते. त्यांचे हावभाव पाहून क्रीडारसिकांनी काय अंदाज लावायचा तो लावला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पण त्यानंतर गोयंका यांनी केएल राहुलसोबत डिनर आयोजित केलं होतं. तसेच वादावर पडदा टाकण्याचं काम केलं. केएल राहुल आणि गोयंका यांनी तसं काहीच झालं नसल्याचं दाखवून दिलं होतं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.