LSG vs RCB IPL 2022: केएल राहुल जे खेळला, त्यावर रवी शास्त्रींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

| Updated on: May 26, 2022 | 2:20 PM

LSG vs RCB IPL 2022: मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मधल्या ओव्हर्समध्ये केएल राहुल ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. केएल राहुलने चांगली सुरुवात करुन दिली.

LSG vs RCB IPL 2022: केएल राहुल जे खेळला, त्यावर रवी शास्त्रींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
केएल राहूल
Follow us on

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (LSG vs RCB) दिलेल्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. लखनौकडून के.एल.राहुलने (KL Rahul) कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. लखनौकडून त्याने सर्वाधिक 59 चेंडूत 78 धावा फटकावल्या. पण मोक्याच्याक्षणी तो आऊट झाला. संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 14 धावांनी RCB ने लखनौवर विजय मिळवला. या पराभवामुळे लखनौची IPL 2022 मधील घौडदौड थांबली. लखनौच्या पराभवानंतर भारताचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केएल राहुलच्या दृष्टीकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र तरीही त्याच्यावर टीका होतेय. पराभवासाठी त्याला जबाबदार धरलं जात आहे.

सात षटकात राहुलचा फक्त एक चौकार

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मधल्या ओव्हर्समध्ये केएल राहुल ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. केएल राहुलने चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेच्या सहा ओव्हर्समध्ये लखनौने 62 धावा फटकावल्या. पावरप्लेमध्ये राहुल 17 चेंडूत 26 धावांवर खेळत होता. त्यानंतर पुढच्या सात षटकात राहुलने फक्त एक चौकार मारला. त्यावेळी रनरेटचा वेग मात्र वाढत होता.

सामना फिनिश करु शकला नाही

7 ते 13 षटकात एलएसजीने फक्त 49 धावा काढल्या. दीपक हुड्डाने मोठे फटके खेळले. पण 15 व्या ओव्हरमध्ये तो आऊट झाला. त्याने 26 चेंडूत 45 धावा फटकावल्या. हुड्डा आऊट झाल्यानंतर राहुलने जबाबदारी घेत वेगाने धावा जमवल्या. पण तो सामना फिनिश करु शकला नाही. जोश हेझलवूडच्या 19 व्या षटकात राहुल 79 धावांवर बाद झाला. लखनौ सुपर जायंट्सला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 193/6 धावांपर्यंत मजल मारता आली. 14 धावांनी आरसीबीने विजय मिळवला.

राहुलने थोडे धोके पत्करायला पाहिजे होते

“काही वेळा तुम्ही थोडं जास्त वेळ थांबून रहाता. इथे 9 व्या ते 14 व्या ओव्हरमध्ये लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भागीदारी होणं आवश्यक होतं” असं रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले. “हुड्डा आणि राहुल फलंदाजी करत होते, तेव्हा केएल राहुलने थोडे धोके पत्करायला पाहिजे होते. हर्षल पटेल शेवटच्या ओव्हर्समध्ये येणार होता. त्यामुळे 9 ते 13 ओव्हर्स दरम्यान केएल राहुलने चान्स घेऊन मोठे फटके खेळायला पाहिजे होते” असं रवी शास्त्री म्हणाले.