
बांगलादेश क्रिकेट संघाची गेल्या काही महिन्यातील एकदिवसीय क्रिकटेमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. बांगलादेश अखेरच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीज विरुद्ध खेळली होती. विंडीजने या मालिकेत बांगलादेशचा सुपडा साफ केला होता. विंडीजने ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली होती. तसेच बांगलादेशला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतही छाप सोडता आली नव्हती. बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नव्हता. बांगलादेशच्या या निराशाजनक कामगिरीचा आलेख पाहता क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलला आहे. नजमुल शांतो याच्या जागी आता ऑलराउंडर मेहदी हसन मिराज याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
मेहदी हसन मिराज आता बांगलादेशच्या एकदिवसीय संघांच नेतृत्व करताना दिसणार आहे. “मेहदी हसन मिराज पुढील 12 महिने बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणार आहे. मेहदी हसन मिराज सातत्याने शानदार बॅटिंग आणि बॉलिंग करत आहे. त्यामुळे आम्ही मेहदीला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला. मेहदीकडे टीमला प्रोत्साहित करण्याची क्षमता आहे. तसेच वनडे टीमचं नेतृत्व करण्यासाठी तो योग्य पर्याय आहे”, असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या ऑपरेशन कमेटीचे अध्यक्ष नजमुल आबेदीन म्हणाले.
मेहदी हसन बांगलादेशचा नवा कर्णधार
STORY | Bangladesh appoint Mehidy Hasan Miraz as ODI captain for one year
READ: https://t.co/1sAPgdm4aW pic.twitter.com/bA6qTaY0GM
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
“आम्ही नजमुलचे आभारी आहोत. कॅप्टन म्हणून तो फार सकारात्मक आहे. नजमुल कायमच लीडरशीप ग्रुपचा भाग राहिला आहे. तसेच नजमुलची फलंदाजी बांगलादेश टीमसाठी फार निर्णायक आहे, हे आम्हाल माहित आहे”, असंही आबेदीन यांनी म्हटलं.
“मिराजने कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. आपल्या देशाच्या संघाचं नेतृत्व करावं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. क्रिकेट बोर्डाने माझ्यावर विश्वास दर्शवला. त्यासाठी मी क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे”, असं म्हणत मिराजने पहिली प्रतिक्रिया दिली. मिराजने आतापर्यंत बांगलादेशचं 105 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मिराजने 1 हजार 617 धावा केल्या आहेत. तसेच 110 विकेट्सही घेतल्या आहेत.
दरम्यान मिराज आयसीसी वनडे रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी आहे. मिराजला 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे. मिराजने नजमुलच्या अनुपस्थितीत बांगलादेशचं नेतृत्व केलं आहे. तर टी 20i संघाच्या कर्णधारपदाची धुरा ही लिटन दास याच्या खांद्यावर आहे.