
श्रेयस अय्यर याच्यासोबत 2024 या वर्षात काही चांगल्या गोष्टी घडल्या. तसेच कधीच न विसरता येणाऱ्याही घटना घडल्या. श्रेयस अय्यर याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं. तर श्रेयसने त्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला 12 वर्षांनंतर ट्रॉफी जिंकून दिली. तर आता 15 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशला पराभूत करत मुंबईला 2022 नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं. श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने ही कामगिरी केली. श्रेयसने या विजयानंतर मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात एमपीवर 5 विकेट्सने विजय मिळवला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उंचावली. श्रेयसने या विजयानंतर चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली.
“जेव्हाही चंदू सर आमच्यासमोर असतात तेव्हा आम्ही पराभूत होतो. मात्र आज आम्ही जिंकलो आणि त्यांची जादू संपवली”,असं श्रेयसने म्हटलं. चंद्रकांत पंडीत यांना प्रशिक्षकपदाचा अनेक दशकांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक संघांचं प्रशिक्षकपद सांभाळलं असून त्यांनी अनेकदा चॅम्पियन केलं आहे.
श्रेयस अय्यरने मुंबईच्या विजयाबाबत बोलताना गोलंदाजांचं कौतुक केलं. श्रेयसने अथर्व अंकोलेकर याचं विशेष कौतुक केलं. “अथर्वने चिवट बॉलिंग करत आम्हाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. तसेच इतर गोलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. आमचा लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन कायम ठेवण्याचा प्रयत्न होता. वर्तमानात राहून आणि सकारात्मक विचारसरणीमुळे आम्ही या स्पर्धेत विजयी होऊ शकलो” असं श्रेयसने म्हटलं. अथर्व अंकोलेकर याने या सामन्यात बॉलिंग आणि त्यानंतर बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. अर्थवने 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 1 विकेट घेतली. तर निर्णायक क्षणी 6 बॉलमध्ये 2 सिक्ससह 16 रन्स ठोकत मुंबईला विजयी केलं.
मध्य प्रदेशने मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर अथर्वसह श्रेयांश शेडगे याने 15 बॉलमध्ये 36 नाबाद धावा ठोकल्या. तर अजिंक्य रहाणे याने 37 धावांची खेळी केली. रहाणेने या हंगामातील एकूण 8 सामन्यांमध्ये 469 धावा केल्या. रहाणेला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.