Video : टाईम आऊटच्या भीतीने अब्रार अहमदची पळापळ, खेळपट्टीच्या दिशेने असा पळाला की शाकिबला आलं हसू

बांगलादेशने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीतही पराभूत केलं. या विजयासह दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. या विजयासह बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश दिला आहे. या सामन्यात एक हसू येईल असा प्रकार घडला. टाईम आऊटच्या भीतीने अब्रार अहमदची झालेली पळापळ पाहून तु्म्हीही हसाल.

Video : टाईम आऊटच्या भीतीने अब्रार अहमदची पळापळ, खेळपट्टीच्या दिशेने असा पळाला की शाकिबला आलं हसू
Image Credit source: video grab
| Updated on: Sep 03, 2024 | 5:09 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट झाल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली होती. शाकीब अल हसनने त्यासाठी अपील केली आणि कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूजला आला तसंच परत जावं लागलं. त्यामुळे शाकिब अल हसनच्या निर्णयाची चर्चा रंगली. त्यात शाकीब अल हसनचा राग सर्वश्रूत आहे. त्यामुळे त्याची धास्ती प्रत्येक खेळाडूंनी घेतली आहे. असाच एक प्रकार पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पाहायला मिळाला. पाकिस्तानचा फिरकीपटू अब्रार अहमदला दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी यावं लागलं. पण रस्त्यातच त्याचे ग्लव्ह्ज पडले होते. पण त्याला ग्लव्ह्ज उचलता उचलता टाइम आउटचा किस्सा आठवला असावा. त्यानंतर वेगाने धावत क्रिजपर्यंत गेला. त्याची ही कृती पाहून शाकीब अल हसनलाही हसू आवरलं नाही.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात 136 धावांवर 8 विकेट पडल्या. त्यामुळे अब्रारला फलंदाजीला येणं भाग पडलं. कारण मोहम्मद रिझवान बाद झाला आणि मोहम्मद अली मैदानात उतरला. अर्थात एखाद दोन षटकं खेळेल असा अंदाज होता. पण हसन महमूदने त्याला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत पाठवलं. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. हसन महमूदच्या गोलंदाजीवर शांतोने त्याचा झेल पकडला. त्यामुळे अब्रार अहमदला मैदानात झटपट उतरण्याची वेळ आली. असं करत असताना हा मजेशीर प्रकार घडला.

अब्रार अहमद दुसऱ्या कसोटी सामन्यात सपशेल फेल ठरला. पहिल्या डावात 9 धावा करून बाद झाला. तर गोलंदाजी करताना 31 षटकं टाकली पण एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या डावात फलंदाजीला आला आणि 12 चेंडूचा सामना करत दोन धावा करून बाद झाला. तर गोलंदाजीत 14 षटकं टाकत 40 धावा देत 1 गडी बाद केला. दरम्यान, बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता बांगलादेशचा संघ भारतात येणार आहे. बांगलादेश दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे.