मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (Ind vs Sa) आज चौथा टी 20 सामना होणार आहे. राजकोटमध्ये (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर ही मॅच होईल. भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या तीन सामने झाले असून दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. भारताला मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी एका आणि दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. पण आजच्या सामन्याआधी हवामान विभागाने (Weather Dept) क्रिकेट चाहत्यांना निराश करणारा अंदाज वर्तवला आहे. राजकोटमध्ये आज मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. संध्याकाळी 6.30 वाजता टॉस उडवला जाईल.
राजकोटमध्ये गुरुवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी सुद्धा पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्याचा परिणाम मॅचवर होऊ शकतो. काल पाऊस कोसळला, त्याचा खेळाडूंच्या तयारीवर कुठलाही परिणाम झाला नाही. कारण खेळाडूंनी सकाळच्या सत्रात सराव केला.
विशाखापट्टनम सारखीच इथेही स्थिती आहे. विशाखापट्टनममध्ये ज्या पद्धतीचा खेळ केला, तसाच खेळ टीम इंडियाला राजकोट मध्ये दाखवावा लागेल. तिथे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाने सरस कामगिरी केली होती.
चौथ्या मॅचआधी टीम इंडियाला आणखी सावध व्हाव लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डि कॉक चौथ्या सामन्यात खेळू शकतो. मागचे दोन सामने डि कॉक दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकन मीडिया रिपोर्ट्सच्या वृत्तानुसार, क्विंटन डि कॉक चौथ्या टी 20 सामन्यासाठी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. डि कॉक पहिला सामना खेळला. पण नंतरचे दोन सामने तो मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत हेनरिक क्लासनला संधी मिळाली. ज्याने मिळालेल्या चान्सचा अचूक लाभ उठवला.