मुंबई: मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya pradesh) हे दोन संघ रणजी करंडक 2022 (Ranji Trophy 2022) स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचले आहेत. बंगळुरुमध्ये अंतिम सामना सुरु आहे. मुंबई संघाचा कॅप्टन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीच्या षटकांमध्ये मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना यश मिळणार नाही, याची मुंबईच्या सलामीवीरांनी काळजी घेतली. पृथ्वी आणि डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची सलामी दिली. पृथ्वीच्या रुपाने मुंबईचा पहिला विकेट गेला. अग्रवालने त्याला क्लीन बोल्ड केलं. पृथ्वीने 79 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकार होता. अरमान जाफर आणि सुवेद पारकर आज मोठी खेळी करु शकले नाहीत. अरमान जाफर डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिकेयच्या गोलंदाजीवर (26) धावांवर दुबेकरवी झेलबाद झाला. त्यानंतर सुवेद पारकरही विशेष चमक दाखवू शकला नाही.
जैनने (18) धावांवर पारकरला श्रीवास्तवकरवी झेलबाद केलं. यशस्वी जैस्वाल आजही खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. पण त्याला आज शतकी खेळी साकारता आली नाही. यशस्वीने क्वार्टर फायनल आणि त्यानंतर सेमीफायनलच्या दोन्ही डावात शतकी खेळी साकारली होती. आज तो 163 चेंडूत 78 धावांची खेळी करुन आऊट झाला. यशस्वी जैस्वालने 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. हार्दिक तामोरे 24 धावांवर आऊट झाला. मुंबईसाठी एक चांगली बाब म्हणजे सर्फराज खान अजूनही खेळपट्टीवर आहे. तो 40 आणि शम्स मुलानी 12 धावांवर नाबाद आहे.
सर्फराजने या सीजनमध्ये 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे उद्या सर्फराजची बॅट तळपली, तर मुंबई धावांचा डोंगर उभारेल. पहिल्यादिवस अखेर मुंबईच्या 5 बाद 248 धावा आहेत. मध्य प्रदेशकडून कुमार कार्तिकेयने एक, अनुभव अग्रवाल आणि सारांश जैनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. 42 व्या रणजी करंडक स्पर्धेच विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईचा संघ मैदानात उतरला आहे.